scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजनैतिकभारत-पाकिस्तान वाद मिटविण्यासाठी चीनकडून ठोस मदतीचा प्रस्ताव

भारत-पाकिस्तान वाद मिटविण्यासाठी चीनकडून ठोस मदतीचा प्रस्ताव

उपप्रमुख लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंग यांच्या टिप्पण्यांना उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले, की संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य बीजिंग आणि इस्लामाबादमधील 'सामान्य सहकार्याचा भाग' आहे.

नवी दिल्ली: चीन भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद “योग्यरित्या सोडवण्यासाठी” “रचनात्मक व ठोस भूमिका” बजावण्यास तयार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोमवारी सांगितले. इस्लामाबादसोबत बीजिंगचे संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य यावर भर देताना त्यांनी हे विधान केले. “ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर चीनलाही तोंड दिले” या उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांच्या गेल्या आठवड्यातील विधानावर उत्तर देताना माओ यांनी इस्लामाबादसोबत बीजिंगच्या “पारंपारिक मैत्रीचे” समर्थन केले आणि म्हटले, की संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य त्यांच्यातील “सामान्य सहकार्याचा” एक भाग आहे.

“भारत आणि पाकिस्तान हे असे शेजारी आहेत ज्यांना दूर हलवता येत नाही, आणि ते चीनचे महत्त्वाचे शेजारीदेखील आहेत. काही काळापासून, चीनने भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीच्या विकासावर बारकाईने लक्ष ठेवले आहे, शांतता चर्चेला सक्रियपणे राजी केले आहे आणि प्रोत्साहन दिले आहे आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरता राखली आहे,” माओ म्हणाल्या. “भारत आणि पाकिस्तान यांनी संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळावेत आणि मूलभूत उपाय शोधावेत यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना पाठिंबा देतो. चीन यासंदर्भात रचनात्मक भूमिका बजावत राहण्यासही तयार आहे. चीन-भारत संबंध सुधारणे आणि विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. चीन-भारत संबंध निरोगी आणि स्थिर मार्गावर विकसित होण्यासाठी आम्ही भारतासोबत काम करण्यास तयार आहोत.” असेही त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात लेफ्टनंट जनरल सिंग यांनी निदर्शनास आणून दिले, की ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तान “फ्रंट फेस” होता, परंतु त्याला चीनकडून “सर्व शक्य पाठिंबा” मिळाला. भारताच्या उत्तर सीमेवर स्वतःहून सहभागी होण्याऐवजी बीजिंग भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानला वापरण्यास प्राधान्य देईल, असे लेफ्टनंट जनरल सिंग यांनी पुढे सांगितले. याबद्दल विचारले असता माओ म्हणाल्या, “तुम्ही ज्या विशिष्ट परिस्थितीचा उल्लेख केला आहे ती मला माहिती नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते, की चीन आणि पाकिस्तान पारंपारिकपणे मैत्रीपूर्ण शेजारी आहेत. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा दोन्ही देशांमधील सामान्य सहकार्याचा भाग आहे, तृतीय पक्षांसाठी नाही.” मी एवढेच म्हणू शकते, की, चीन-पाकिस्तान संबंध कोणत्याही तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करत नाहीत. हे चीनचे धोरण आहे. भारत-पाकिस्तान संबंधांवर, आम्ही दोन्ही बाजूंना संवाद आणि सल्लामसलतीद्वारे योग्यरित्या मतभेद सोडवण्यास आणि संयुक्तपणे प्रदेश शांततापूर्ण आणि स्थिर ठेवण्यास पाठिंबा देतो.” असे प्रतिपादन त्यांनी केले. भारत आणि चीनमधील संबंध “सुधारणा आणि विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहेत”, आणि संबंध पुढे नेण्यासाठी बीजिंग नवी दिल्लीसोबत काम करण्यास तयार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

2020 च्या उन्हाळ्यात झालेल्या गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये भारताने जाहीर केले की दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घर्षण बिंदूंवर सैन्य कमी करण्याचा करार झाला आहे, ज्यामुळे 23 ऑक्टोबर 2024 रोजी रशियाच्या कझान शहरात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठकीसाठी मार्ग मोकळा झाला. तेव्हापासून दोन्ही देश विश्वास निर्माण करण्यासाठी उपाययोजना करत आहेत, ज्यामध्ये या उन्हाळ्यात बीजिंगने कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे समाविष्ट आहे, तर नवी दिल्ली थेट हवाई संपर्क पुन्हा सुरू करण्यासाठी तांत्रिक तपशीलांवर काम करत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने रविवारी निषेध केला. हा निषेध ब्रिक्स नेत्यांच्या निवेदनाचा एक भाग होता, जो गटाच्या सदस्यांमध्ये एकमत झाल्यानंतर जाहीर करण्यात आला होता. तथापि, 7 मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, तेव्हा बीजिंगने पाकिस्तानमधील दहशतवादी संकुलांवर लष्करी हल्ले “खेदजनक” असल्याचे म्हटले होते.

‘बीजिंगकडून दलाई लामांचा निषेध’

माओ निंग यांनी असेही म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 90 वर्षीय दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल बीजिंगने निषेध नोंदवला आहे. दलाई लामा हे 1959 मध्ये तिबेटमधून पळून गेले होते आणि तेव्हापासून ते हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे वास्तव्यास आहेत.”शिझांगशी संबंधित (तिबेट) मुद्द्यांवर चीन सरकारची भूमिका सुसंगत आणि स्पष्ट आहे. सर्वज्ञात आहे की, 14 वे दलाई लामा हे एक राजकीय निर्वासित आहेत जे दीर्घकाळापासून चीनविरोधी फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत आणि धर्माच्या आडून शिझांगला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत”

“भारताला शिझांगशी संबंधित मुद्द्यांच्या संवेदनशीलतेची पूर्णपणे जाणीव असणे आवश्यक आहे, 14 व्या दलाई लामा यांचे चीनविरोधी आणि फुटीरतावादी स्वरूप स्पष्टपणे पाहणे आवश्यक आहे, शिझांगशी संबंधित मुद्द्यांवर भारताने चीनला दिलेल्या वचनबद्धतेचे पालन करणे आवश्यक आहे, विवेकपूर्णपणे वागणे आवश्यक आहे आणि चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी त्या मुद्द्यांचा वापर करणे थांबवणे आवश्यक आहे. चीनने भारताच्या कृतींबद्दल निषेध व्यक्त केला आहे.” असे प्रतिपादन माओ यांनी केले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments