नवी दिल्ली: मंगळवारी काबुलमधील अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्रावर (रुग्णालयावर) पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. या हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. भारताने या कृतीला ‘रानटी, अमानुष आणि विवेकशून्य हिंसक कृत्य’ असे संबोधले आहे. ‘इस्लामाबादने केलेल्या या हवाई हल्ल्याच्या सूत्रधारांना जबाबदार धरण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलावीत’, असे आवाहन नवी दिल्लीने केले आहे.
“16 मार्चच्या रात्री काबुलमधील ‘उमीद ॲडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल’वर पाकिस्तानने केलेल्या रानटी हवाई हल्ल्याचा भारत निःसंदिग्धपणे निषेध करतो. हे एक भित्रेपणाचे आणि विवेकशून्य हिंसक कृत्य आहे, ज्यामध्ये एका अशा केंद्रातील मोठ्या संख्येने नागरिकांचा बळी गेला आहे; ज्या केंद्राला कोणत्याही परिस्थितीत लष्करी लक्ष्य म्हणून समर्थनीय ठरवता येणार नाही. पाकिस्तान आता एका नरसंहाराला ‘लष्करी कारवाई’चे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे: “पाकिस्तानची ही कृती घृणास्पद असून अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर केलेला उघड हल्ला आणि प्रादेशिक शांतता व स्थिरतेला निर्माण झालेला थेट धोका आहे. यातून पाकिस्तानच्या बेपर्वाईच्या वर्तनाची सातत्यपूर्ण पद्धत आणि आपल्या सीमांपलीकडे जाऊन, अधिकाधिक हताश हिंसक कृत्यांद्वारे आपल्या अंतर्गत अपयशांचे खापर इतरांवर फोडण्याचे त्याचे वारंवारचे प्रयत्न दिसून येतात.”
अफगाणिस्तानच्या राजधानीतील रुग्णालयावर सोमवारी उशिरा संध्याकाळी झालेल्या या हवाई हल्ल्यामुळे त्या नागरी केंद्राचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. आधुनिक अफगाणिस्तानच्या इतिहासातील हा कदाचित सर्वात प्राणघातक हल्ला ठरू शकतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून संघर्ष सुरू असतानाच ही घटना घडली आहे. या हल्ल्याच्या काही तास आधी, दोन्ही देशांनी आपल्या सीमेवर गोळीबार झाल्याचे मान्य केले होते, ज्यामध्ये किमान चार अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानने हा हल्ला ‘रमजानच्या पवित्र महिन्यात’ केल्याबद्दलही भारताने त्याचा निषेध केला; कारण जगभरातील मुस्लिम समुदायांमध्ये हा महिना ‘शांतता, चिंतन आणि दयाभावनेचा काळ’ मानला जातो. “कोणताही धर्म, कोणताही कायदा आणि कोणतीही नैतिकता एखाद्या रुग्णालयाला आणि त्यातील रुग्णांना हेतुपुरस्सर लक्ष्य करण्याचे समर्थन करू शकत नाही,” असे जैस्वाल म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘भारत पीडित कुटुंबांप्रती आपली सखोल संवेदना व्यक्त करतो, जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या कठीण प्रसंगी अफगाणिस्तानच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.’
“आम्ही अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी आमचा अटूट पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त करतो.” पाकिस्तानने रुग्णालयावर हल्ला केल्याचा इन्कार केला असून, आपले हल्ले हे तालिबानच्या “दहशतवादी पायाभूत सुविधांना” मदत करणाऱ्या लष्करी तळांना लक्ष्य करून करण्यात आले होते, असे प्रतिपादन केले आहे.” असेही त्यांनी सांगितले. इस्लामाबादने तालिबानवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांसारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे; मात्र काबुलने हा दावा फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तारार यांनी एका निवेदनात म्हटले, “काबुलमधील दोन ठिकाणच्या तांत्रिक सहाय्य पायाभूत सुविधा आणि दारूगोळा साठवणूक केंद्रांचा प्रभावीपणे विध्वंस करण्यात आला. हल्ल्यानंतर झालेले स्पष्ट दुय्यम स्फोट (secondary detonations) हे तिथे मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचे साठे अस्तित्वात असल्याचे स्पष्टपणे दर्शवतात.” पाकिस्तान आपल्या देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात आलेल्या अपयशाचे खापर इतर तिसऱ्या देशांवर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तालिबानने केला आहे. हा हल्ला त्याच दिवशी झाला, ज्या दिवशी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एक ठराव एकमताने मंजूर केला. या ठरावाद्वारे तालिबानला दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मोहिमेचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी, म्हणजेच 17 जूनपर्यंत वाढवण्यात आला.
डिसेंबर 2024 पासून, अफगाणिस्तानमधील नागरी पायाभूत सुविधांवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांचा भारताने सातत्याने निषेध केला आहे. तालिबानने भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये दोन्ही देशांनी आपापल्या राजनैतिक कार्यालयांना (missions) दूतावासाचा दर्जा प्रदान केला. कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्यासह तालिबानच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी 2025 च्या उत्तरार्धात नवी दिल्लीला भेट दिली होती.

Recent Comments