चेन्नई: पेरुंगुडी येथील कार्तिक यांच्यासाठी त्यांच्या घरापासून व्यवसाय कार्यशाळेपर्यंत पोचणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यांच्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा हा एक मोठा अडथळा आहे. त्यांना अक्षरशः श्वास रोखून मोटारसायकल चालवावी लागते. याला कारण, दक्षिण चेन्नईतील 200 एकरांहून अधिक जागा व्यापलेल्या 50 वर्षांपासूनच्या कचऱ्याच्या ढिगातून येणारी दुर्गंधी. “डंपयार्ड ओलांडताना, सुरुवातीपासूनच ही दुर्गंधी हा सर्वांत मोठा चिंतेचा विषय आहे. जसजसा दिवस जातो तसतसा संध्याकाळच्या वेळी ती अधिक तीव्र होते. तिथून प्रवास करताना नाक बंद करावे लागते. आणि ते खूप कठीण असते,” कार्तिक सांगतात.
घनकचऱ्यासाठी चेन्नईच्या दोन दफनभूमींपैकी एक असलेले पेरुंगुडी लँडफिल, अलीकडे तेथील अस्वच्छता व दुर्गंधीमुळे चर्चेत आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन अनेक दशकांपासून येथे साचलेले कचऱ्याचे ढीग काढून ही जमीन किंवा तिचा काही भाग पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिथून फर्निचर, वापरण्यायोग्य वाळू, रस्त्याच्या कडेला असलेले पाणी, प्लास्टिक बोर्ड, स्टोरेज पॅलेट आणि अगदी पर्यायी इंधन हे सर्व बाहेर काढले जात आहे. “येथे दररोज सुमारे 3 हजार मेट्रिक टन कचरा टाकला जातो. कचरा कमी करण्यासाठी आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या जमिनीचा पुनर्वापर करण्यासाठी, व येथे कचरा प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी, ही कल्पना होती,” असे ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनसाठी पेरुंगुडी येथील प्रकल्पाचे पर्यवेक्षण करणारे सहाय्यक कार्यकारी अभियंता आर कन्नन म्हणाले.

कार्तिक त्यांच्या भावाने स्थापन केलेल्या कार्यशाळेचे व्यवस्थापन करतात. ते वॉटर जेट कटर बनवतात. ते पेरुंगुडी लँडफिलच्या काठावर आहे. 250 एकरांवर पसरलेला हा कचऱ्याचा विस्तार रहिवासी, कार्यकर्ते आणि ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (जीसीसी) यांच्यात बराच काळ वादाचा विषय राहिला आहे. लँडफिल तामिळनाडूच्या 20 रामसर स्थळांपैकी एक असलेल्या पल्लीकरनई मार्शलँडला लागून आहे. हे मार्शलँड 101 प्रजातींचे निवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. “जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा दुर्गंधी असह्य होते. या परिस्थितीत काम करणे कठीण होते,” असे स्थलांतरित कामगार राजू म्हणाला. तो एका मिनी-ट्रकवर मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर उतरवण्याचे काम करतो. बिहारचा रहिवासी असलेला राजू वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरच्या गोदामात काम करतो.
केवळ कार्तिक आणि राजूच नाही, तर जुन्या महाबलीपुरम रोड (ओएमआर) च्या दुसऱ्या बाजूला चेन्नई वन आयटी सेझमध्ये हजारो आयटी व्यावसायिकांचाही हाच अनुभव आहे. त्यांच्यासाठी जीवन थोडे सुसह्य करण्याची प्रक्रिया, किमान 2021 पासून सुरू आहे. तेव्हा ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (जीसीसी) ने याची पुनर्बांधणी सुरू केली. ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेल्या पुनर्बांधणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, साइट सहा पॅकेजेसमध्ये विभागली गेली. त्यानंतर सिंगापूरस्थित फर्म ‘ब्लू प्लॅनेट’च्या भारतीय उपकंपनी झिग्मा ग्लोबल एन्व्हायरन सोल्युशन्सने साफसफाई आणि इतर प्रक्रिया हाती घेतली. “पेरुंगुडी डंपसाईटमध्ये ब्लू प्लॅनेटच्या झिग्माने सुमारे 17 लाख 30 हजार 584 घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे,” असे ‘झिग्मा ग्लोबल एन्व्हायर्न सोल्युशन्स’चे संचालक नागेश प्रभू चिनिवर्थ म्हणाले. प्रक्रिया म्हणजे उत्खनन, वेगळे करणे आणि पुनर्वापरयोग्य सामग्रीमध्ये रूपांतरित केलेला कचरा.

हे किचकट काम पार पाडण्यासाठी 250 कर्मचाऱ्यांना कामावर लावण्यात आले, ज्यामध्ये नऊ समांतर यंत्रसामग्री वापरण्यात आल्या. यामध्ये हॉपर, बेल्ट कन्व्हेयर्स, ट्रॉमेल्स, मातीचे अचूक विभाजक, टॉर्नाडो विभाजक, डिस्क स्क्रीन विभाजक, एअर डेन्सिटी विभाजक, ओव्हरबँड मॅग्नेटिक विभाजक आणि श्रेडर यांचा समावेश होता.
‘बायोमायनिंग’
पुनर्प्राप्ती व पुनर्वापर प्रकल्पाच्या केंद्रस्थानी ‘बायोमायनिंग’ नावाची प्रक्रिया आहे. “बायोकॅपिंगच्या विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे. बायोकॅपिंगमध्ये फक्त कचरा असतो, बायोमायनिंगमुळे जमीन पुनर्प्राप्ती, संसाधन पुनर्प्राप्ती आणि अवशेषांची सुरक्षित विल्हेवाट लावता येते,” नागेश म्हणाले. या प्रक्रियेत पाच टप्पे समाविष्ट आहेत.

पहिले पाऊल म्हणजे पूर्व-व्यवहार्यता मूल्यांकन, ज्यामध्ये मशीन आणि मनुष्यबळाचा आढावा घेणे, खर्च-लाभ विश्लेषण करणे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच इतर स्थानिक आणि राज्य अधिकाऱ्यांकडून परवानग्या घेणे, हे सर्व समाविष्ट आहे. या टप्प्यात कचऱ्याचे प्रमाण, भौतिक आणि रासायनिक रचनेव्यतिरिक्त – समोच्च सर्वेक्षण आणि स्तरीकृत यादृच्छिक नमुन्याद्वारे साइटच्या जल-भूगर्भीय आणि पर्यावरणीय वैशिष्ट्यांचेदेखील मूल्यांकन केले जाते. त्यानंतर जेसीबी आणि लोडर वापरून कचरा उत्खनन केले जाते. ते करण्यापूर्वी, कचरा ‘बायोकल्चर स्प्रे’ वापरून स्थिर केला जातो, जो विघटनाला गती देतो आणि दुर्गंधी कमी करतो. शेवटी सक्शन पंप वापरून गोळा केला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. पण त्याआधी, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या: लँडफिल वायू आणि लीचेट ड्रेनेज तपासणे, किंवा भूपृष्ठावरील आग ओळखणे आणि विझवणे. उत्खनन केल्यानंतर, कचरा वजन, घनता आणि चुंबकीय वैशिष्ट्यांवर आधारित वेगळ्या पदार्थांमध्ये विभागला जातो.
काढलेला कचरा माती भरणे, लँडस्केपिंग, प्लास्टिक रस्ते आणि फर्निचरसाठी वापरला जातो. तो प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये तपासून घेतला जातो. ज्यामुळे कचरा धोकादायक आहे की नाही आणि कॅलरीफिक मूल्य, राख आणि आर्द्रता निकष पूर्ण करतो की नाही, हे निर्धारित केले जाते.

प्रक्रियेतून निर्माण होणारा निष्क्रिय कचरा बांधकाम-दर्जाच्या वापरण्यायोग्य वाळूमध्ये रूपांतरित केला जातो. तो रस्ता मध्यवर्ती भाग बनवण्यासाठीदेखील वापरला जातो. प्लास्टिक नॉन-रीसायकल करण्यायोग्य कचरा बोर्ड आणि स्टोरेज पॅलेटमध्ये रूपांतरित केला जातो. “पृथक्करणानंतर सापडलेल्या एचडीपीई (उच्च-घनता पॉलीथिलीन), एलडीपीई (कमी-घनता पॉलीथिलीन) आणि एलएलडीपीई (रेषीय कमी-घनता पॉलीथिलीन) पासून, आम्ही एक्सट्रूजन वापरून फर्निचरमध्ये रूपांतरित करू शकतो.” नागेश म्हणाले. लँडफिलमधून सापडलेले प्लास्टिक, कागद, कापड आणि लाकूड यासारखे ज्वलनशील पदार्थ कचऱ्यापासून मिळवलेले इंधन (आरडीएफ) मध्ये रूपांतरित केले जातात आणि पर्यायी इंधन म्हणून सिमेंट प्लांटना पुरवले जातात. “प्रक्रियापूर्व खर्चामुळे सिमेंट प्लांट अनेकदा एससीएफ (पृथक्करण केलेले ज्वलनशील अंश) स्वीकारण्यास नकार देतात” असेही ते म्हणाले. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनचे कन्नन यांनी याला दुजोरा दिला. “विल्हेवाटीचा मोठा भाग आरडीएफ आहे. आम्हाला त्याची विल्हेवाट फक्त सिमेंट प्लांटमध्येच लावावी लागते. चेन्नईमध्ये कोणतेही मोठे सिमेंट कारखाने नाहीत, म्हणून आम्हाला ते कर्नाटक, केरळ अशा इतर राज्यांमध्ये वाहून नेले पाहिजे,” असे त्यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.

यानंतर कोडुंगैयुर
कन्नन म्हणाले, की पेरुंगुडी येथील जमीन परत मिळवणे आणि त्या ठिकाणी केंद्रीय कचरा प्रक्रिया सुविधा उभारणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. अशा सुविधांचे बांधकाम आधीच सुरू झाले आहे. “आता आम्ही फक्त 25 एकर राखीव जमिनीवर ताजा कचरा टाकतो. आम्ही विंड्रो कंपोस्टिंग आणि आरडीएफसारख्या केंद्रीकृत प्रक्रिया सुविधा प्रस्तावित केल्या आहेत. एकदा हे तयार झाले की, येथे येणारा वेगळा कचरा दररोज प्रक्रिया केला जाईल. भविष्यात या जमिनीवर डंपिंग होणार नाही,” कन्नन म्हणाले.

पेरुंगुडी पुनर्वापराच्या सहा पॅकेजपैकी तीन पूर्ण झाले आहेत, उर्वरित तीन पॅकेजेस 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. “साइटचा पुनर्वापर केला जाण्यापूर्वी, साइटवर कोणतेही जड धातू किंवा प्रदूषक शिल्लक नाहीत, याची खात्री करण्यासाठी भूपृष्ठ चाचणी केली जाईल. पण प्रकल्प तिथेच संपणार नाही. चेन्नईतील दुसरे कचऱ्याने व्यापलेले ठिकाण म्हणजे कोडुंगैयुर हे आहे. कोडुंगैयुरमध्ये झिग्मा सहापैकी चार पॅकेजेस राबवत आहे, ज्यामध्ये 156 एकर जमीन पुनर्प्राप्त करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांत एकूण 44 लाख टन कचरा प्रक्रिया करणे आवश्यक आहे. कोडुंगैयुरमधील प्रकल्प खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे आणि आम्ही आधीच 22 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण केली आहे,” नागेश म्हणाले. पेरुंगुडीच्या जवळच्या परिसरात, पुनर्वापरामुळे बांधकामाचा एक नवीन प्रवाह सुरू झाला आहे. एका बाजूला शॉपिंग आउटलेटची रांग येत आहे, ज्यामध्ये एअर फ्रेशनर्सने भरलेले रॅक आहेत.

जरी अनेक दशकांपासून कुजणाऱ्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या भागात झालेले नुकसान पूर्णपणे पूर्ववत करता येईल की नाही, हे स्पष्ट नसले तरी, पुनर्बांधणी हे पहिले पाऊल आहे. पल्लीकरनई दलदलीच्या प्रदेशासाठी सकारात्मक बाब आहे. चेन्नईच्या काही उरलेल्या हिरव्यागार प्रदेशांपैकी, ते एक असल्याने ते एखाद्या नैसर्गिक स्पंजसारखे आहे- मुसळधार पावसात पाणी शोषून घेते, साठवते आणि हळूहळू सोडते.
पल्लीकरनई दलदलीची जमीन वाचवणे
ओएमआर आणि बकिंगहॅम कालव्याच्या समांतर, मरीना बीचवरील किनाऱ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर, पल्लीकरनई हा 1 हजार 248 हेक्टरचा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पाणथळ प्रदेश आहे. हा प्रदेश 235 किमी आहे.

2007 मध्ये, तामिळनाडू सरकारने या भागाला ‘राखीव वन’ म्हणून घोषित केले. 2010 च्या एका अभ्यासानुसार, येथे 76 विविध प्रजातींच्या वनस्पती-प्राणी व 25 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आढळतात. यापैकी, लिटिल ग्रेब आणि ब्लॅक-विंग्ड स्टिल्ट हे सर्वात जास्त आढळतात. पल्लीकरनई हे स्पॉट-बिल्ड पेलिकन आणि ब्लॅक-हेडेड आयबिस या दुर्मिळ पक्षी प्रजातींचेदेखील घर आहे.
पक्षी आता वसंत ऋतूमध्ये आपापले अधिवास स्वच्छ करत आहेत आणि जवळपास काम करणाऱ्यांना आता नाक दाबून धरावे लागत नाही. परंतु चेन्नईच्या रहिवाशांना ते तसेच ठेवण्यासाठी त्यांचा कचरा उगमस्थानावरच वेगळा करावा लागेल, जेणेकरून पल्लीकरनईला दुर्गंधीने गुदमरून जाणार नाही.

Recent Comments