नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख ‘चांगला मित्र’ आणि ‘जनतेचा महान नेता’ असा केला. या ज्येष्ठ राजकारण्यासह अन्य चार जणांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला.
आपले दुःख व्यक्त करताना फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले: “या बातमीने महाराष्ट्राला खूप दुःख झाले आहे. आपल्या सर्वांसाठी, इतका मोठा नेता गमावणे, हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. वैयक्तिक आयुष्यात ते माझे चांगले मित्र होते. आम्ही अनेक आव्हानांना एकत्र सामोरे गेलो. ज्या वेळी ते महाराष्ट्राच्या विकासात योगदान देत होते, त्याच वेळी त्यांचा अकाली मृत्यू हे एक मोठे नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली आहे आणि त्यांनीही यावर दुःख व्यक्त केले आहे. आता जेव्हा ते महाराष्ट्राच्या विकासात इतक्या खंबीरपणे योगदान देत होते, जेव्हा आम्ही सर्वांनी विचार केला होता, की ते एक मोठी राजकीय इनिंग खेळतील, अशा वेळी त्यांना गमावल्यामुळे माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक संबंधांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार हे एक खंबीर आणि दिलदार स्नेही होते. हे दुःख पवार कुटुंबावर आणि त्यांच्या राजकीय कुटुंबावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोसळले आहे, ते सहन करणे खरोखरच खूप कठीण आहे. पण या कठीण काळात आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.” ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बारामतीला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. “पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू आणि पुढील दिशा ठरवू.” असे ते म्हणाले.
लियरजेट 45 (VT-SSK) या चार्टर्ड विमानात अजित पवार यांच्यासह आणखी चारजण होते. फ्लाइट्रेडार 24 ने दिलेल्या माहितीनुसार, विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असतानाच कोसळले. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, फडणवीस यांनी जीव गमावलेल्या इतर चार जणांच्या कुटुंबीयांप्रतीही शोक व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने राज्यभर सुट्टीही जाहीर केली आहे.

Recent Comments