scorecardresearch
Friday, 26 December, 2025
घरदेशशस्त्रसंधी उल्लंघनाच्या भीतीमुळे उरीमध्ये परिस्थिती सामान्य होण्याची आशा

शस्त्रसंधी उल्लंघनाच्या भीतीमुळे उरीमध्ये परिस्थिती सामान्य होण्याची आशा

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही हे समजून घ्यावे की, स्थानिक लोक त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्याची आशा बाळगून आहेत आणि त्यांना हल्ले आणि युद्धाचे धोके नको आहेत, असे स्थानिक रहिवाशांचे मत आहे.

उरी: 10 मे रोजी पहाटे 5 वाजता सायरन ऐकू येताच 45 वर्षीय मोहम्मद अशरफ आणि त्यांचा जावई इशफाक अहमद हे त्यांच्या घराच्या ओसरीत आश्रय घेण्यासाठी धावले. दहा मिनिटांतच त्यांच्या घराजवळ एक बॉम्ब पडला आणि घर उद्ध्वस्त झाले. दोन दिवसांनंतर, पाकिस्तानजवळ असलेल्या नियंत्रण रेषेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बांदी गावातील रहिवासी अशरफ, यांनी घरातील नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्या घरातील सामान बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  खिडक्या फुटल्या होत्या, भिंतींना तडे गेले होते आणि छताला छिद्र पडले होते.

7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्या आणि केंद्रांवर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सतत केलेल्या गोळीबारामुळे उरी शहर आणि शेजारच्या गावांमधील जीवन थांबलेले दिसले. नियंत्रण रेषेवरील भागात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या शस्त्रसंधी लागू असल्याचे दिसत असले तरी, बहुतेक लोक उरी आणि आसपासच्या गावांमधून बारामुल्ला आणि इतर शहरांमधील नातेवाईकांकडे आश्रय घेण्यासाठी निघाले आहेत. ज्यांचे नातेवाईक नाहीत त्यांनी बारामुल्ला येथील सरकारी पदवी महाविद्यालयात आश्रय घेण्याचा पर्याय निवडला आहे.

उरीचे स्थलांतरित रहिवासी.
उरीचे स्थलांतरित रहिवासी.

रेस्टॉरंट्स, किराणा दुकाने, शेती आणि इतर कामे थांबली आहेत. “आम्हाला त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा लागू नये म्हणून आम्ही आमच्या महिला आणि मुलांना बारामुल्ला येथील माझ्या सासरच्या लोकांकडे पाठवले आहे. आम्ही येथे घराची पाहणी करण्यासाठी आलो होतो, जे तिथे आहे पण प्रत्यक्षात तिथे नाही,” असे 30 वर्षीय इशफाक अहमद म्हणतात.

रहिवाशांकडून कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी 

उरी येथील रहिवासी मकबूल बांडे म्हणतात, की “भारत आणि पाकिस्तान दोघांनीही हे समजून घ्यावे की, स्थानिक लोक त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्याची आशा बाळगून आहेत आणि त्यांना हल्ले आणि युद्धाचे धोके नको आहेत.” बांडे 8 मे ते 10 मे रात्री गावात राहिले, इतर तिघांसह एका मशिदीत आश्रय घेतला आणि नंतर 11 मे रोजी डिग्री कॉलेज उरी येथे राहायला गेले. “आम्हाला काश्मीर जगाच्या इतर कोणत्याही भागासारखे विकास, नोकऱ्या, पर्यटन यांनी युक्त आणि सुरळीत राहावे अशी इच्छा आहे”, असे आणखी एक रहिवासी म्हणतात. उरीच्या मुख्य बाजारपेठेपासून 10 किमी अंतरावर असलेल्या लगामा येथे, 8 मे रोजी रात्री सज्जादच्या किराणा दुकानावर गोळ्यांचा मारा झाला. जळालेले कस्तुरीचे खरबूज, कांदे, किवी आणि संत्र्याच्या रसाच्या बाटल्या, जळालेले वजन यंत्र आणि टिनचे पत्रे ढिगाऱ्यात विखुरलेले होते.

“8 मे रोजी रात्री 11 वाजता पाकिस्तानने उरीच्या दिशेने गोळीबार सुरू केला आणि भारतानेही प्रत्युत्तर दिले. रात्री 12 वाजता मला माझ्या दुकानात आग लागल्याची माहिती मिळाली, परंतु सतत गोळीबार होत असल्याने मी खात्री करून घेऊ शकलो नाही. सकाळी उठल्यावर आम्हाला कळले की आपण सर्वस्व गमावले आहे,” सज्जाद म्हणाले. ते म्हणाले, की उरीमधील व्यवसाय कायमस्वरूपी युद्धबंदीवर अवलंबून आहे. ”  आम्ही इथे शून्यापासून व्यवसायाला सुरुवात केली तरी केव्हाही हल्ले आणि गोळीबारात तो उध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला इथे गुंतवणूक करायची नाही.  1947 च्या आक्रमणादरम्यान पाईन वृक्षांनी झाकलेल्या पर्वतांनी वेढलेले उरी हे नयनरम्य शहर पाकिस्तानी आदिवासी सैन्याने हल्ला केलेल्या पहिल्या भागांपैकी एक होते. काही दिवसांनी भारतीय सैन्याने ते पुन्हा ताब्यात घेतले. तेव्हापासून हे शहर भारत-पाकिस्तान संघर्षाच्या प्रत्येक प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा राहिले आहे.

किराणा दुकानाच्या ढिगाऱ्याजवळ सज्जाद अहमद
किराणा दुकानाच्या ढिगाऱ्याजवळ सज्जाद अहमद

11 मे रोजी जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शहराला भेट दिली आणि दुकानदारांचे सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. “येथे चांगल्या सुविधा असायला हव्यात,” एका दुकानदाराने त्यांना सांगितले. उरीचे नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार सजाद शफी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. “1947, 1965 आणि 1971 च्या युद्धांपासून आणि 1998 च्या गोळीबारापासून आणि गेल्या 35 वर्षांपासून आपण खूप त्रास सहन करत आहोत. जेव्हा जेव्हा दोन देशांमध्ये शत्रुत्व असते तेव्हा सीमेवरील लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. आपण जीव, घरे आणि शेतीची जमीन गमावली आहे,” शफी म्हणतात. “ही कायमस्वरूपी युद्धबंदी असावी. आपल्याला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, लखनौ, इस्लामाबाद आणि कराचीच्या लोकांसारखे जगायचे आहे.” असेही मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments