लखनौ /अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अयोध्येतील राम मंदिर पूर्णत्वास गेल्याच्यान निमित्ताने मंदिराच्या बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त भगवा ‘धर्मध्वज’ फडकावला. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा ध्वज ब्रह्माच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व करतो आणि सत्य आणि धर्माचे प्रतीक आहे. तो सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही. तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा भगवा रंग, सूर्यवंश प्रतीक, पवित्र शब्द ‘ओम’ आणि कोविदार वृक्ष एकत्रितपणे रामराज्याची भव्यता प्रतिबिंबित करतात. हा ध्वज एक प्रतिज्ञा, एक कामगिरी आणि संघर्षापासून निर्मितीपर्यंतचा प्रवास दर्शवितो, शतकानुशतके दिसलेल्या चिकाटीचे ते मूर्त प्रतीक आहे.”
“आज संपूर्ण भारत आणि अगदी जग राममय झालेले आहे. आज प्रत्येक रामभक्ताला समाधान आणि कृतज्ञतेची भावना आहे. दैवी आनंदाची भावना आहे. शतकानुशतके वागवलेल्या जखमा आणि वेदना अखेर बऱ्या होत आहेत. जुना संकल्प पूर्ण होत आहे. आज 500 वर्षांपासून केलेल्या त्यागाची पूर्तता होत आहे,” असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले.
पंतप्रधान मोदींनी पुढील 10 वर्षांत भारताला “गुलामगिरीच्या मानसिकतेतून” मुक्त करण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यानंतरही वसाहतवादी मानसिकता कायम राहिली आणि लोक परकीय कल्पना श्रेष्ठ मानू लागले. “असे म्हटले जात होते की, आपले संविधान परकीय संविधानांनी प्रेरित आहे, परंतु सत्य हे आहे, की भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे,” ते म्हणाले.
कार्यक्रमातील संदेश
पंतप्रधानांच्या भाषणात स्पष्ट राजकीय संदेश होता, विशेषतः उपेक्षितांसाठी. पंतप्रधानांनी दोनदा राम मंदिराच्या आत असलेल्या ऋषी मंदिराचा उल्लेख केला आणि निषादराज, ज्यांनी वनवासात भगवान रामाला गंगा पार करण्यास मदत केली आणि रामाला जांभळे अर्पण करणाऱ्या आदिवासी तपस्वी माता शबरी यांचा उल्लेख केला. काही निरीक्षकांचे म्हणणे आहे, की ब्राह्मण ऋषींच्या मंदिरांसोबत निषादराज आणि शबरीचे मंदिर उभारल्याने सामाजिक समावेशाचा एक मजबूत संदेश मिळतो. त्यांचा असा विश्वास आहे, की हे भाजपच्या मोठ्या हिंदुत्वाच्या छत्राखाली विविध जातींना एकत्र आणण्याच्या धोरणाशीदेखील जुळते, ज्यामुळे भूतकाळात पक्षाला राजकीयदृष्ट्या मदत झाली आहे. नाविक आणि मच्छीमार समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा निषाद पक्ष उत्तर प्रदेशात भाजपचा सहयोगी आहे. त्याचप्रमाणे, शबरीचे मंदिर आदिवासी समुदायांमध्ये भाजपचा पाठिंबा बळकट करू शकते.

वाराणसीतील डोम समुदायाच्या तीन सदस्यांनाही ध्वजारोहण समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ते दिवंगत डोम राजा जगदीश चौधरी यांचे नातेवाईक आहेत, ज्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव सुचवले होते. डोम समुदाय अंत्यसंस्कार विधी पार पाडतो आणि ‘पवित्र अग्नी’ प्रदान करतो जो दिवंगत आत्म्यांना शांती मिळविण्यास मदत करतो असे मानले जाते, हिंदू परंपरेत ही एक महत्त्वाची भूमिका आहे, जरी बहुतेकदा याला फारशी मान्यता मिळत नाही. अशा कोणत्याही कार्यक्रमात डोम समुदायाच्या सदस्यांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ होती.
गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी पंतप्रधानांचे आवाहन
“आपण भगवान रामांकडून शिकले पाहिजे, त्यांचे चरित्र समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे,” असे मंदिराच्या स्थापत्य पूर्णत्वाच्या निमित्ताने झालेल्या राम मंदिर ध्वजारोहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले, की भारताने 1835 मध्ये सुरू झालेल्या मॅकॉले शिक्षण व्यवस्थेशी जोडलेली “गुलाम मानसिकता” सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “देशाने 2035 पर्यंत या वारशापासून मुक्त होण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. मकॉले यांनी भारतात गुलामगिरीच्या मानसिकतेचा पाया घातला. पुढील 10 वर्षांत, आपण देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. भारताने वर्तमानाच्या पलीकडे विचार केला पाहिजे. 2047 मध्ये, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा आपण विकसित भारत उभारला पाहिजे. पुढील हजार वर्षांसाठी आपण देशाचा पाया मजबूत केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
त्यांनी अल्पकालीन विचारसरणीविरुद्ध इशारा दिला. “जर आपण फक्त आजवर लक्ष केंद्रित केले, तर आपण भविष्यातील पिढ्यांवर अन्याय करतो. भारत आपल्या आधीही अस्तित्वात होता आणि आपल्यानंतरही राहील. भारत हा एक चैतन्यशील समाज आहे, ज्याला दूरदृष्टीने काम करण्याची आणि येणाऱ्या दशके आणि शतकांबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे. असेही पंतप्रधान म्हणाले.

Recent Comments