नवी दिल्ली: ‘शेजारील देशांतून होणारी परकीयांची घुसखोरी भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहे, या मुद्द्याकडे जातीय किंवा सांप्रदायिक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शुक्रवारी केले. ‘द प्रिंट’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. “बांगलादेशातून होणारी घुसखोरी ही भारताची राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी एक धोका आहे; तसेच यामुळे देशाच्या संसाधनांवर ताण पडत आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून ‘घुसखोरी’चा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. “अर्थातच, येथे बेकायदेशीर घुसखोर आहेत, विशेषतः बांगलादेशातून आलेले; ही एक चिंतेची बाब आहे. त्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकता, अखंडता, सुरक्षा आणि अगदी आपल्या संसाधनांसाठी व आर्थिक सुविधांसाठीही हा एक अत्यंत गंभीर धोका आहे,” असे आंबेकर यांनी नमूद केले. “यामुळे आपल्यावर एक प्रकारचा बोजा निर्माण होत आहे. शिवाय, ते बेकायदा मतदार बनत आहेत आणि आपल्या लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे, एका अर्थाने, कोणत्याही देशासाठी हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे. मला वाटते की आपण याकडे जातीय दृष्टीकोनातून पाहू नये,” असे आंबेकर यांनी, भाजपकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या लोकसांख्यिकीय असंतुलन आणि घुसखोरी या मुद्द्यांविषयी विचारले असता, सांगितले. “राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने या मुद्द्याचे निराकरण तातडीने केले गेले पाहिजे. ही एक देशव्यापी समस्या आहे; कारण आसाम, ईशान्येकडील इतर राज्ये आणि अगदी बंगालसारख्या राज्यांमध्ये घुसखोरांची संख्या कदाचित मोठी असू शकेल, परंतु ही समस्या केवळ त्या विशिष्ट भागांपुरतीच मर्यादित नाही,” असे त्यांनी पुढे जोडले.
आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सरकारची एक योजना नमूद केली होती. एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची ती योजना होती. “आज मी देशाला एका चिंतेबाबत आणि आव्हानाबाबत सावध करू इच्छितो. एका सुव्यवस्थित कटाअंतर्गत, देशाच्या लोकसंख्येचा समतोल ढासळत आहे. एका नव्या समस्येची बीजे रोवली जात आहेत. हे घुसखोर या देशातील तरुणांचा रोजगार (रोजी-रोटी) हिरावून घेत आहेत आणि माझ्या देशातील भगिनी व कन्यांना लक्ष्य करत आहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही.” असे मोदी म्हणाले होते. आंबेकर यांनी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येत असलेल्या ‘विशेष सखोल पडताळणी’ प्रक्रिये’चे समर्थन केले. ज्यांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत, परंतु जे खरोखरच पात्र मतदार आहेत, त्यांची नावे यादीत पुन्हा समाविष्ट केली जावीत, असे त्यांनी यावेळी नमूद केले. “एसआयआर ही एक सामान्य प्रक्रिया आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे पुनरावलोकन केले जाते आणि ही प्रक्रिया काही पहिल्यांदाच घडत नाहीये. मला वाटते की निवडणूक आयोगाने या संदर्भातील सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत आणि सामान्य जनतेची याबद्दल कोणतीही तक्रार नाही,” असेही ते पुढे म्हणाले.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ यांसारख्या संज्ञांच्या वापराचे समर्थन करताना, अंबेकर यांनी यावर भर दिला की, हे शब्द मुस्लिम समुदायाविरुद्ध नसून, विशिष्ट व्यक्तींविरुद्ध वापरले गेले आहेत. “लव्ह जिहादसारख्या काही संज्ञा अशा आहेत, ज्या एका वास्तवाचे प्रतिबिंब आहेत; या माध्यमातून एक प्रकारचा गुन्हाच घडत आहे. दहशतवाद हे वास्तव नाही का? इस्लामिक मूलतत्त्ववादी दहशतवाद हे वास्तव नाही का? ही एक जागतिक स्तरावरील घटना आहे. अशा प्रकारची दुष्ट प्रवृत्ती केवळ शस्त्रास्त्रांवर आधारित दहशतवादापुरतीच मर्यादित नसून, त्यात पैसा, बळाचा वापर आणि इतर गैरप्रकारांचाही समावेश होतो. त्यामुळे ही टीका किंवा हे शब्द मुस्लिम समुदायाविरुद्ध किंवा इतर कोणाविरुद्धही नाहीत,” असे ते म्हणाले. पश्चिम आशियातील संघर्षांच्या संदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करताना, आंबेकर म्हणाले की, ‘हा प्रश्न आता केवळ त्या विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संपूर्ण जगाशी संबंधित बनला आहे’. “मला वाटते की, राष्ट्रीय हिताचे रक्षण करत ही परिस्थिती हाताळण्यास आमचे सरकार पूर्णपणे सक्षम आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय प्रश्न उद्भवतात आणि एक देश म्हणून आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक राजकीय पक्षाने आणि प्रत्येक संस्थेने सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे,” असे त्यांनी पुढे नमूद केले.
विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना, आंबेकर यांनी पुन्हा एकदा या गोष्टीचा पुनरुच्चार केला की, ‘प्रत्येकानेच सरकारला पाठिंबा दिला पाहिजे’. “हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा काळ आहे; अशावेळी आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचे, आपल्या लोकांचे आणि आपल्या गरजांचे रक्षण करणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, की सरकार ही परिस्थिती अत्यंत समर्थपणे हाताळत आहे आणि आपण सर्वांनीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.” ते म्हणाले.

Recent Comments