तिरुवनंतपुरम: केरळमधील आगामी निवडणुकांसाठी आपल्या प्रचाराला सुरुवात करताना, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सत्ताधारी सीपीआय(एम) पक्षावर ‘मतांसाठी जातीय ध्रुवीकरण करण्याकरिता संघ परिवाराच्याच मार्गावर चालत असल्याबद्दल’ जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘टीम यूडीएफ’ कधीही तडजोड करणार नाही आणि जातीयवादाची भाषा करणाऱ्या प्रत्येकाला जाब विचारेल. शुक्रवारी संध्याकाळी कासारगोड जिल्ह्यातील कुंबला येथे आपल्या ‘पुथुयुग यात्रा’ (नव्या युगाकडे कूच) सुरू करताना, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन् यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगल्या कम्युनिस्टांना सोबत घेण्याचे आवाहन केले, कारण ते काँग्रेसलाच मतदान करणार आहेत.
“त्यांना वाटले होते की, डावे सत्तेवर आले तर राज्याचा विकास होईल आणि राज्य अधिक चांगले होईल. पण आता त्यांना कळले आहे, की डावे हे डावे राहिलेले नाहीत आणि ते अति-उजवे आहेत. मग डावे कोण आहेत? आम्ही. आम्ही नेहरूवादी डावे आहोत. आम्ही बदलाच्या बाजूने उभे आहोत,” असे सतीशन् म्हणाले. तसेच, बहुसंख्याक किंवा अल्पसंख्याक जातीयवादाबद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाला जाब विचारणे हे यूडीएफचे मुख्य प्राधान्य आहे, असेही त्यांनी सांगितले. कासारगोड येथून सुरू झालेली ही यात्रा 7 मार्च रोजी तिरुवनंतपुरम येथे समाप्त होईल. सतीशन् म्हणाले की, “यूडीएफ राज्यात एका नव्या युगाची सुरुवात करत आहे आणि वाईट कारभाराच्या युगाचा अंत करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी यूडीएफने सरकारचे दोष लोकांसमोर आणले होते”, असेही त्यांनी सांगितले.
“गेल्या 30 वर्षांतील यूडीएफच्या सर्वात मोठ्या विजयासह जनतेने आपला कौल दिला आहे. आम्ही एका मोठ्या युद्धाला सुरुवात करत आहोत. आम्ही केवळ विरोधी पक्ष नाही. आम्ही, टीम यूडीएफ, 100 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेवर येणार आहोत,” असे सतीशन् म्हणाले. ‘सध्याचे सरकार ज्या सर्व क्षेत्रांमध्ये अपयशी ठरले आहे, त्या सर्व क्षेत्रांमध्ये ‘टीम यूडीएफ’ सरकार काय करेल हे लोकांना सांगण्याची जबाबदारी यूडीएफची आहे’, असेही त्यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सहापैकी चार महापालिका, 87 पैकी 54 नगरपालिका, 14 पैकी सात जिल्हा परिषदा, 152 पैकी 79 गटपंचायती आणि 941 पैकी 505 ग्रामपंचायती जिंकून मोठा विजय मिळवला होता. ‘ही टीम तरुणांना राज्यातच थांबवून ठेवण्यासाठीही काम करेल’, असे सतीशन् म्हणाले. ते म्हणाले की, “पुढील महिन्यात तिरुवनंतपुरममध्ये यात्रा संपेल, तोपर्यंत लोक केवळ राज्याच्या भविष्यासाठीच्या यूडीएफच्या अजेंड्याबद्दलच बोलत असतील, कारण यूडीएफ विविध क्षेत्रांतील तज्ञांशी चर्चा करून तयार केलेले अनेक उपक्रम सादर करणार आहे. एलडीएफने राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. यूडीएफ राज्याला भारताची सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनवण्याच्या योजना घेऊन येत आहे,” ‘यूडीएफ राज्याच्या आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यास मदत करेल, जे सध्या ‘व्हेंटिलेटरवर’ आहे, आणि सर्व क्षेत्रांमध्ये बदल दिसून येईल, ज्यामुळे केरळचे वेळेवर परिवर्तन होईल’. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“यूडीएफ येत आहे. चांगल्या तयारीने. मोठ्या आत्मविश्वासाने. जगभरातील मल्याळी लोकांच्या, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे अशा लोकांच्या, तज्ञ आणि व्यावसायिकांच्या पाठिंब्याने. अशा योजना निश्चितपणे केरळमध्ये येतील. तो बदल, हेच यूडीएफचे वचन आहे,” असे ते म्हणाले. या मोर्चाचे उद्घाटन करताना, एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, “केरळ काँग्रेसच्या मोर्चाची आतुरतेने वाट पाहत आहे. एखाद्या सरकारविरुद्ध इतका तीव्र सत्ताविरोधी रोष राज्याने यापूर्वी कधीही पाहिला नाही. काळ बदलत आहे, केरळही. पण सुशिक्षित लोक राज्याकडे निराशेने पाहत आहेत. त्यांना राज्य सोडून जायचे आहे. यासाठी जबाबदार कोण? आम्हाला माहीत आहे, की हे पिनराई विजयन सरकार आहे, जे येथे 10 वर्षांपासून राज्य करत आहे. त्यांनी आधी तरुणांना उत्तर दिले पाहिजे.”

Recent Comments