ढाका: बांगलादेशचा मुख्य विरोधी पक्ष, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) देशाच्या 13 व्या संसदीय निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचे दिसत आहे. यामुळे शेख हसीना यांना पदावरून हटवल्यानंतर 18 महिन्यांनी आता नाट्यमय राजकीय बदल घडून आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पहिल्या निकालांनुसार, बीएनपीने पहिल्या 100 जागांपैकी 73 जागा जिंकल्या – हा मोठा विजय असल्याचे संकेत आहेत. 41 मतदारसंघांमधील सुरुवातीचे जे निवडणूक कल आले, त्यात बीएनपीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले.
निकालांमध्ये बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान बनण्यासाठी आघाडीवर आहेत. जर त्यांची निवड झाली, तर ते 36 वर्षांमध्ये देशातील पहिले पुरुष सरकारप्रमुख असतील आणि महिला नेत्यांच्या वर्चस्वाचा दीर्घ काळ संपुष्टात येईल. अनेक दशकांपासून, बांगलादेश महिलांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर वेगळे ठरले: बीएनपीच्या, रहमान यांच्या आई खालिदा झिया यांनी दोन पूर्ण कार्यकाळ सेवा दिली, तर अवामी लीगच्या हसीना यांनी 15 वर्षे म्हणजे चार कार्यकाळ राज्य केले. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका ही तरुणांच्या नेतृत्वाखालील उठावाने हसीना यांची राजवट उलथवून टाकल्यानंतरची पहिलीच निवडणूक होती. रहमान ढाका-17 आणि बोगुरा-6 या दोन्ही मतदारसंघांत अनधिकृतपणे निवडून आले. ढाका-17 मध्ये त्यांनी 72 हजार 699 मते मिळवली, त्यांनी बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी एस.एम. खालिदुज्जमान यांचा पराभव केला. खालिदुज्जमान यांना 68 हजार 300 मते मिळाली. बीएनपीला एकेकाळी अवामी लीगचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागातही यश मिळाले. गोपाळगंज, शरीयतपूर, मदारीपूर आणि फरीदपूर या जिल्ह्यांमध्ये, पक्षाने 13 पैकी 11 जागा जिंकल्या, असे आकडेवारीवरून दिसून आले. एकदा निश्चित झालेल्या दुहेरी विजयांमुळे रहमान यांच्या शहरी आणि प्रादेशिक मतदारसंघांमध्ये पाठिंबा एकत्रित होण्यावर भर पडेल.
एक्सवरील एका पोस्टमध्ये, बीएनपीच्या मीडिया सेलने विजयाचा दावा करत म्हटले आहे की, “बहुसंख्य जागांवर विजय मिळवल्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी-बीएनपी- सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे.” निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जागांवर निकाल प्रक्रिया अद्याप सुरू आहेत. बीएनपीने यापूर्वीच घोषणा केली होती, की जर त्यांनी निवडणूक जिंकली तर त्यांचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान असतील. “दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा आम्हाला विश्वास आहे,” असे बीएनपीच्या केंद्रीय निवडणूक सुकाणू समितीचे प्रवक्ते महदी अमीन यांनी शुक्रवारी पहाटे एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. तरीही, बीएनपी नेत्यांनी शुक्रवारी समर्थकांना सार्वजनिक उत्सवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले, त्याऐवजी देशभरात प्रार्थना आणि शांततेचे आवाहन केले. बीएनपीचे मुख्य प्रतिस्पर्धी, जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी पराभव मान्य केला आणि पक्ष त्यासाठी ‘विरोधी राजकारणात सहभागी होणार नाही’, असे सांगितले.
स्थानिक टीव्ही वृत्तांनुसार, हसीना यांना पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि जमातच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग असलेल्या युवा कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी) ने लढवलेल्या 30 जागांपैकी फक्त पाच जागा जिंकल्या. स्थानिक टीव्ही व वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, रहमान यांनी मंगळवारी दूरचित्रवाणीवरील भाषणात त्यांच्या पक्षाच्या भूतकाळातील त्रुटी मान्य केल्या आणि मतदारांची माफी मागितली. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कठोर उपाययोजना, कायद्याचे राज्य पुनर्संचयित करण्याचे आणि जबाबदार प्रशासनाचे वचन दिले. “जर बीएनपीला राज्य चालवण्याची जबाबदारी दिली, तर आम्ही एक स्वावलंबी बांगलादेश निर्माण करू.” असे त्यांनी सांगितले, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय वेतनश्रेणी वेळेवर लागू करण्याचे आणि सर्व क्षेत्रांमध्ये समान विकासाचे आश्वासन दिले. त्यांनी समावेशकतेवर भर देत असे म्हटले की, बीएनपीच्या नेतृत्वाखाली मुस्लिम, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, श्रद्धावान आणि अश्रद्ध सर्वजण सुरक्षित राहतील.
निवडणुकीला ‘ऐतिहासिक टप्पा’ म्हणून संबोधत, रहमान म्हणाले, की ‘मागील प्रशासनाने लोकांकडून राज्याची मालकी हिसकावून घेतली आहे आणि सर्व लोकशाही राजकीय अधिकार हिरावून घेतले आहेत’, तसेच नवीन मतदानाने दीर्घ चळवळी आणि त्यागाद्वारे ती मालकी पुनर्संचयित केली आहे’. गुरुवारी झालेल्या 300 लोकसभा मतदारसंघांपैकी 299 मतदारसंघांसाठी अपक्षांसह 2000 हून अधिक उमेदवार रिंगणात होते. एका उमेदवाराच्या निधनामुळे एका जागेसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

Recent Comments