चेन्नई: मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी पार पडलेला शपथविधी सोहळा एका राजकीय वादाचे केंद्र बनला. या सोहळ्यात तामिळनाडूचे राज्यगीत असलेल्या ‘तामिळ थाई वाझतू’ला ‘वंदे मातरम’ आणि राष्ट्रगीतानंतर, म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर वाजवण्यात आले. यामुळे राज्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा मोडली गेली आणि विविध राजकीय पक्षांकडून यावर टीका करण्यात आली.
टीव्हीकेचे मंत्री आधव अर्जुन यांनी या क्रमवारीचे कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच जारी केलेला एक निर्देश असल्याचे सांगितले. या निर्देशानुसार, जेव्हा एखाद्याच कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ आणि राष्ट्रगीत दोन्ही सादर केले जातात, तेव्हा राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’ची सर्व सहा कडवी गायली जाणे अनिवार्य आहे. देशात राष्ट्रगीताचा 150 वा वर्धापन दिन साजरा होत असताना हा निर्देश जारी करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी भूषवले होते; आणि पक्षाच्या म्हणण्यानुसार, ते या परिपत्रकाचे पालन करण्यास बांधील होते.
“राज्यपाल हे एक जबाबदार प्राधिकरण असल्याने, त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन परिपत्रकानुसारच कृती करणे आवश्यक आहे, असे त्यांना कळवण्यात आले होते. त्यानुसार, एका अपरिहार्य परिस्थितीत ‘तामिळ थाई वाझतू’ हे गीत तिसऱ्या क्रमांकावर वाजवण्यात आले. तथापि, “भविष्यात या नवीन पद्धतीचे अनुसरण केले जाणार नाही. त्याऐवजी, पूर्वीच्या प्रथेनुसारच, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘तामिळ थाई वाझतू’ आणि कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत वाजवले जाईल,” असे अर्जुन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट केले. तामिळनाडूसाठी ही नवीन पद्धत अनुचित असल्याचे सांगत, अर्जुन यांनी माहिती दिली की, शपथविधी सोहळ्यापूर्वीच पक्षाने या मुद्द्यावर राज्यपालांकडे आपला आग्रह नोंदवला होता. त्यांनी केंद्र सरकारला अशीही विनंती केली की, संपूर्ण भारतातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये राज्यगीतांनाही तितकेच प्राधान्य दिले जावे; आणि ही मागणी म्हणजे तामिळनाडूच्या जनतेची सामूहिक भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वादामुळे सत्ताधारी आघाडीतील विविध घटकांकडूनही टीकेचा सामना करावा लागला. टीव्हीकेचे मित्रपक्ष, ज्यामध्ये सीपीआय, सीपी आणि व्हीसीके यांचा समावेश आहे. त्यांनी या प्रथाभंगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध केला. सीपीआयचे राज्य सचिव एम. वीरपांडियन यांनी रविवारी एक निवेदन जारी करत नवीन सरकारला अशी विनंती केली की, भविष्यातील सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तामिळ थाई वाझतू’ ला सन्मानाचे आणि अग्रक्रमाचे स्थान दिले जाईल, याची त्यांनी खात्री करावी.
काँग्रेसच्या खासदार ज्योतिमणी यांनीही ‘एक्स’वर आपला निषेध नोंदवला. “तामिळनाडूमध्ये, सरकारी कार्यक्रमांची सुरुवात ‘तामिळ थाई वाझतू’ ने करण्याची आणि समारोप राष्ट्रगीताने करण्याची प्रथा आहे. तामिळनाडू सरकारने भविष्यातही ही प्रथा अबाधित राहील, याची खात्री करणे आवश्यक आहे. तामिळनाडूमध्ये ‘तामिळ थाई वाझतू’ लाच नेहमीच मुख्य आणि अग्रक्रमाचे स्थान राहिले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. ‘तमिळ ताई वाझतू’ हे अधिकृतपणे राजगीत म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याचा जागतिक स्तरावर प्रचार करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

Recent Comments