scorecardresearch
Monday, 25 May, 2026
घरराजनैतिक‘युद्धोत्तर काळात अरब राष्ट्रांशी इराणचे संबंध सुधारतील’: अब्दुल माजिद हकीम इलाही

‘युद्धोत्तर काळात अरब राष्ट्रांशी इराणचे संबंध सुधारतील’: अब्दुल माजिद हकीम इलाही

"अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धानंतर अरब देश आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा होईल; कारण त्यांना आता हे उमजले आहे की, कोणीही त्यांचे रक्षण करू शकत नाही किंवा त्यांना शांतता मिळवून देऊ शकत नाही," असे इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी सोमवारी सांगितले.

गुरुग्राम: “अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धानंतर अरब देश आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा होईल; कारण त्यांना आता हे उमजले आहे की, कोणीही त्यांचे रक्षण करू शकत नाही किंवा त्यांना शांतता मिळवून देऊ शकत नाही,” असे इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी सोमवारी सांगितले.

सोमवारी गुरुग्राममध्ये ‘द प्रिंट’च्या ‘ऑफ द कफ’ कार्यक्रमात बोलताना, इलाही यांनी संयुक्त अरब अमिरातीचा उल्लेख इराणचा ‘सर्वांत जवळचा शेजारी’ असा केला आणि तेहरानसोबत त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे नमूद केले. मात्र, जेव्हा त्यांनी अबुधाबीच्या वॉशिंग्टनसोबतच्या धोरणात्मक युतीचा संदर्भ दिला, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा सूर अचानक बदलला. “त्यांनी आपली भूमी अमेरिकेच्या स्वाधीन केली, त्यांना आणि इतर देशांना पाठिंबा दिला आणि त्यांनी आमच्यावर हल्ले केले; तरीही, आम्ही मात्र या देशावर हल्ला केला नाही. आम्हाला हल्ला करायचा नाही; आम्ही केवळ आमचे स्वतःचे रक्षण करतो,” असे ते म्हणाले. संयुक्त अरब अमिरातीचे इस्रायलसोबत वाढते संबंध परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करत आहेत का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी अत्यंत व्यावहारिक भूमिका मांडली. “इतर कोणत्याही देशाशी संबंध ठेवणे ही त्यांची स्वतःची बाब आहे, त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या धोरणांमध्ये आम्हाला कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. तरीही, त्यांनी एक स्पष्ट लक्ष्मणरेषा आखून दिली, आमच्या शत्रूला आमच्यावर हल्ला करण्याची संधी किंवा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची तुम्हाला परवानगी नाही. हीच खरी मुख्य समस्या आहे.”

अरब शेजाऱ्यांशी असलेल्या इराणच्या व्यापक संबंधांकडे वळताना, इलाही यांनी दोन्ही बाजूंमधील तणावाचे मूळ हे अंतर्गत वैमनस्यापेक्षा बाह्य दबावात असल्याचे प्रतिपादन केले. “आमच्या शेजाऱ्यांशी आमचे संबंध खरोखरच खूप चांगले होते. आम्ही एकाच वंशाचे, एकाच लोकांचे आणि एकाच संस्कृतीचे आहोत; त्यामुळे त्यांच्याबाबत आमची कोणतीही समस्या नव्हती,” असे ते म्हणाले. “दुर्दैवाने, या अरब देशांनी, जे आमचे शेजारी आहेत, आपली भूमी (अमेरिकेच्या) स्वाधीन केली आणि इराणच्या विरोधात लष्करी तळ उभारण्यास सुरुवात केली. काही अमेरिकन सिनेटरच्या अहवालानुसार, इराणला 45 लष्करी तळांनी वेढलेले होते.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांचा संदर्भ देत, इलाही म्हणाले की, आखाती देशांच्या नेत्यांना अमेरिकेच्या संरक्षणावर अवलंबून राहण्यासाठी राजी करण्यात आले होते. “जर मी तुमचे रक्षण केले नाही, तर तुम्ही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही,” असे ट्रम्प यांचे वाक्य त्यांनी उद्धृत केले; आणि अशा प्रकारच्या विधानांमुळेच परवलंबन अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सुचवले.

गेल्या आठवड्यात, इराणने पाच अरब देशांकडे -सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार आणि जॉर्डन भरपाईची मागणी केली. आपल्या भूभागावर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये या देशांनी मदत केल्याचा आरोप इराणने त्यांच्यावर केला होता. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या अमेरिका-इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर, तेहरानने इस्त्रायल, इराक, जॉर्डन आणि अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या आखाती देशांना लक्ष्य करून प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊन हजारो लोक मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त आल्यानंतर, गेल्या आठवड्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जमाल फारेस अलरोवाईई यांना पाठवलेल्या पत्रात, इराणचे संयुक्त राष्ट्रांमधील दूत अमीर सईद इरावानी यांनी असा आरोप केला की, या देशांनी सदर हल्ल्यांना पाठिंबा देऊन आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, त्यामुळे या देशांना जबाबदार धरले जावे आणि या संघर्षादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांनी इराणला द्यावी.

दरम्यान, इराणने ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’मधील सहा देशांवर 4 हजार 300हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत; पश्चिम आशियातील या युद्धात इराणने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईचा हाच मुख्य भाग ठरला आहे. याचा सर्वाधिक फटका संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) बसला आहे; फेब्रुवारी महिन्यात या देशाला किमान 1 हजार 815 ड्रोन आणि 372 क्षेपणास्त्रांचा सामना करावा लागला, तसेच 100 हून अधिक हल्ल्यांच्या घटनांची नोंद झाली.

 

असे असले तरी, इराणच्या या प्रतिनिधीने सावध आशावादाची टीप देऊन आपले म्हणणे संपवले. शेजारील देशांशी असलेल्या संबंधांविषयी बोलताना ते म्हणाले, “काही वेळा परिस्थिती फारशी चांगली नव्हती, तरीही आम्ही अत्यंत चांगले आणि दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की, आता या युद्धानंतर आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि मजबूत होतील. कारण त्यांना आता याची जाणीव झाली आहे की, कोणीही त्यांचे रक्षण करू शकत नाही आणि कोणीही त्यांच्यासाठी शांतता प्रस्थापित करू शकत नाही.”

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments