लखनौ: बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांचे सासरे आणि राज्यसभेचे माजी सदस्य अशोक सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या शिस्तभंगाच्या कारवाईत बसपचे समन्वयक रणधीर सिंग बेनीवाल यांनाही पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे.
मायावती यांनी अशोक सिद्धार्थ यांच्यावर पक्षाची शिस्त वारंवार मोडल्याचा आणि संघटनात्मक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी असाही आरोप केला की, कर्नाटक, ओडिशा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये त्यांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली नाही. पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची सिद्धार्थ यांची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी 2025 मध्ये, शिस्तभंगाच्या अशाच आरोपांमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते, परंतु दोन महिन्यांनंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. यापूर्वी आकाश आनंद यांच्यावरही मायावतींनी दोन वेगवेगळ्या प्रसंगी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. हकालपट्टीची घोषणा करण्यापूर्वी, मायावतींनी अशोक सिद्धार्थ यांच्याकडील दिल्ली, कर्नाटक, ओडिशा आणि बंगालच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नेते रणधीर सिंग बेनीवाल यांना पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या प्रभारीपदावरून मुक्त करण्यात आले. पक्षाने सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टद्वारे या दोन्ही हकालपट्ट्यांची अधिकृत घोषणा केली.
“बसपमध्ये अशोक सिद्धार्थ आणि राज्यसभा सदस्य रामजी गौतम हे दोन वेगळे गट (लॉबी) म्हणून उदयास येत होते,” असे एका पक्षनेत्याने ‘द प्रिंट’ला सांगितले. “सिद्धार्थ यांच्या बाजूने आकाश आनंद आणि इतर तरुण नेते होते, तर रामजी गौतम यांना सतीश मिश्रा यांच्यासह जुन्या नेत्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे, या गटांमध्ये बऱ्याच काळापासून काहीसा तणाव किंवा मतभेद सुरू होते. परंतु मिश्रा यांचा मायावतींशी थेट संपर्क असल्याने, अशोक सिद्धार्थ यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यासाठी मायावतींवर प्रभाव टाकण्यात रामजी गौतम यांचा गट यशस्वी ठरला.” असे ते म्हणाले. या पदाधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सिद्धार्थ यांच्या गटाकडून अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप होता की, पक्षाकडून निवडणुकीची तिकिटे कोणाला द्यायची हे आकाश आनंद ठरवणार आहेत.
2016 ते 2022 या काळात राज्यसभेचे सदस्य राहिलेले सिद्धार्थ यांनी विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. ते तीन दशकांहून अधिक काळ पक्षाशी जोडलेले होते.
मायावतींचे स्पष्टीकरण
बसपा प्रमुख मायावतींनी 2027 च्या उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी उमेदवार निवडण्याबाबत आकाश आनंद यांच्या भूमिकेबद्दलच्या चर्चा किंवा तर्कवितर्क दूर करण्याचाही प्रयत्न केला. आकाश आनंद पक्षाची तिकिटे निश्चित करतील, अशा दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात अलीकडेच बरीच चर्चा रंगली होती. या बातम्या फेटाळून लावताना मायावती म्हणाल्या की, ‘आनंद यांची भूमिका केवळ अशा जाहीर सभांना संबोधित करण्यापुरती मर्यादित आहे, जिथे आधीच निवडलेल्या उमेदवारांची ओळख करून दिली जाते; आणि याचा पक्षांतर्गत त्यांचे महत्त्व वाढवण्याशी किंवा कमी करण्याशी काहीही संबंध नाही’. अशा दाव्यांमध्ये तिळमात्रही तथ्य नाही,असे ठामपणे सांगत, मायावतींनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आनंद यांच्याबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या निराधार अफवा आणि जातिवादी प्रचारावर विश्वास ठेवू नये.
मायावतींनी हे स्पष्ट केले की, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बसपाचे उमेदवार निवडण्याचा अधिकार केवळ त्यांच्याकडेच आहे. त्यांनी सांगितले की, लखनौ येथील पक्ष कार्यालयात त्यांनी स्वतः अनेक राज्यस्तरीय आढावा बैठका घेतल्या आहेत आणि दोन डझनहून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची नावे निश्चितही केली आहेत. उर्वरित उमेदवारांची निवडही त्या स्वतःच करतील, असेही त्यांनी नमूद केले. ‘एक्स’वरील एका सविस्तर पोस्टमध्ये मायावती यांनी नमूद केले की, उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या स्वतः पक्षाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. आकाश आनंद यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न केले जात असल्याचे सांगत, त्यांनी असे दावे पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढे नमूद केले की, ‘गेल्या वर्षभरात आकाश आनंद यांच्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनेचा आढावा घेणे आणि विविध राज्यांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणे यांसारख्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत’. मायावती यांच्या मते, या जबाबदाऱ्या पक्षाच्या नियमित संघटनात्मक प्रक्रियेचा भाग आहेत आणि त्यांचा पक्षाचे उमेदवार ठरवण्याशी किंवा संघटनेतील आनंद यांच्या स्थानात बदल करण्याशी कोणताही संबंध नाही.
मायावती यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इतर वरिष्ठ बसपा पदाधिकाऱ्यांप्रमाणेच आकाश आनंद हेदेखील पक्ष अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि त्यांना केवळ नेतृत्वाने आधीच मंजूर केलेल्या उमेदवारांची नावे निवडक जाहीर सभांमध्ये घोषित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या ‘जातीयवादी घटकां’पासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

Recent Comments