scorecardresearch
Tuesday, 18 August, 2026
घरराजकारणराज्यसभेत चर्चेनंतर 'वंदे मातरम' विधेयकाला मंजुरी

राज्यसभेत चर्चेनंतर ‘वंदे मातरम’ विधेयकाला मंजुरी

'आदराची भावना कायद्याने लादता येत नाही,' असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. 'वंदे मातरम'ला विरोध करणे म्हणजे 'भारत तेरे तुकडे होंगे' अशी घोषणा देणाऱ्या गटाचे मनोधैर्य वाढवण्यासारखे आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले. चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

नवी दिल्ली: राज्यसभेने बुधवारी ‘राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2026’ मंजूर केले. या विधेयकावर जोरदार चर्चा झाली; यात विरोधकांनी विधेयकाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि राष्ट्रीय गीताप्रती आदर हा कायद्याद्वारे निर्माण करता येत नाही, असे मत मांडले. सरकारने म्हटले की, ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला विरोध करणे म्हणजे ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशी घोषणा देणाऱ्या गटाचे मनोधैर्य वाढवण्यासारखे आहे.

या कायद्यांतर्गत राष्ट्रध्वज, भारताचे संविधान आणि राष्ट्रगीत यांचा अपमान केल्यास शिक्षेची तरतूद आहे. या विधेयकामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळेल. गेल्या आठवड्यात आंदोलकांवरील पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी आणि निदर्शने केली; याच वातावरणात या विधेयकावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान नंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. विधेयकावरील चर्चेदरम्यान, आरजेडीचे खासदार प्रा. मनोज कुमार झा म्हणाले, “मी पहिल्यांदाच पाहत आहे, की माझे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम यांना एकमेकांविरुद्ध उभे केले जात आहे. सुभाष बाबू यांना नेहरूजींविरुद्ध उभे केले जात आहे. आपण हे काय करत आहोत?” त्यांनी ठामपणे सांगितले की, “आदरभाव कायद्याने लादता येत नाही.” तसेच, ‘वंदे मातरम, कर ले थोडी शरम’ या घोषणेला अपमान मानले जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थीदशेत असताना आम्ही ही घोषणा द्यायचो, असे सांगत देशातील तरुणांच्या वतीने आपण हा प्रश्न विचारत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपचे खासदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी आरोप केला की, गेल्या 123 वर्षांपासून ‘वंदे मातरम’चा अपमान केला जात आहे आणि संविधान सभेत ‘वंदे मातरमवर’ कधीच चर्चा झाली नाही, असा दावाही त्यांनी केला. त्यांनी आरोप केला की, “केवळ आजचा काँग्रेस पक्षच नाही, तर स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील काँग्रेसनेही या गीताचा अपमान केला”. ‘वंदे मातरम’ गाणाऱ्या अनेक क्रांतिकारकांचा उल्लेख करत ते म्हणाले, “क्रांतिकारकांना या गाण्यातून प्रेरणा मिळत असे, त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांना या गाण्यामुळे न्यूनगंड वाटायचा; त्यांना स्वतःचे महत्त्व कमी असल्याचे जाणवायचे.”

अग्रवाल यांनी काँग्रेसच्या 1923 मधील काकीनाडा अधिवेशनाचा संदर्भ दिला; या अधिवेशनाचे अध्यक्ष मोहम्मद अली जौहर यांनी गायक विष्णू दिगंबर पलुस्कर हे गाणे गाण्यासाठी उभे राहिले असता निषेध नोंदवला होता. ते म्हणाले, “1923 च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात, जेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांनी ‘वंदे मातरम’चा अपमान केला आणि हे गीत काँग्रेसच्या अधिवेशनात गायले जाणार नाही असे सांगितले, तेव्हा त्या अध्यक्षाला, मुस्लिम लीगचा दलाल आणि भारतावर अफगाण आक्रमणाला परवानगी देणारी ती भारतविरोधी व्यक्ती- काँग्रेसमधून काढून टाकण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. असहकार आंदोलनादरम्यानच त्यांनी फाळणीचा पाया रचला होता.”

आप खासदार संजय सिंग म्हणाले की, “ज्या पक्षाने 52 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर भारतीय ध्वज फडकवला नाही, त्या पक्षाकडून असे विधेयक आणले जाणे हास्यास्पद आहे.” सिंग पुढे म्हणाले, “आज लोक ‘वंदे मातरम’च्या अपमानाविरोधात कडक कायदा आणण्याबद्दल बोलत आहेत. ‘ऑर्गनायझर’ नावाचे एक मुखपत्र आहे, ज्याने 1949 मध्ये लिहिले होते, की राष्ट्रगीत ही मनोरंजनाची एक बाब आहे. तुम्ही त्या राष्ट्रगीताचा अपमान केला; ज्या संस्थांनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही संघाच्या शाखांवर ध्वज का फडकवत नाही?” ते म्हणाले. तसेच, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली. आपल्या उत्तरात, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, ‘हे विधेयक केवळ एक कायदेशीर बदल नसून भारताचा आत्मा, राष्ट्रीय जाणीव, सांस्कृतिक वारसा आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदर्श यांच्याप्रती असलेली एक सामूहिक बांधिलकी आहे’. मला समजत नाही, की 1-2 लोक ‘वंदे मातरम’ला का विरोध करत आहेत? काँग्रेसला ‘वंदे मातरम’बद्दल काय आक्षेप आहे, हे मला कळत नाही,” असेही ते म्हणाले.

नित्यानंद राय पुढे म्हणाले की, 1971 च्या मूळ कायद्यात राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत (‘जन गण मन’) यांचा अपमान केल्यास शिक्षेची तरतूद आहे. या सुधारणेमुळे राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम’ च्या अपमानासाठीही तितकाच आदर आणि शिक्षेची तरतूद सुनिश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राय यांनी ठामपणे सांगितले, “‘वंदे मातरम’च्या विरोधात असणे याचा अर्थ असा की, देशाचा अभिमान कमी करण्यासाठी काँग्रेस नेहमीच ध्रुवीकरणाचे धोरण स्वीकारते. विरोधक ‘वंदे मातरम’च्या विरोधात का आहेत? ‘वंदे मातरम’ला विरोध करणे म्हणजे ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशी घोषणा करणाऱ्या टोळीचे मनोधैर्य वाढवण्यासारखे आहे. परंतु देशातील तरुण, शेतकरी, महिला आणि कामगार ‘भारत तेरे टुकडे होंगे’ ही घोषणा खपवून घेणार नाहीत. अशा लोकांना धडा शिकवला जाईल.” ते म्हणाले की, “स्वामी विवेकानंद यांनी भाकीत केले होते की 21 वे शतक भारताचे असेल. स्वामी विवेकानंदांचे बालपणीचे नाव नरेंद्र होते. एका नरेंद्रने भाकीत केले होते आणि ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते, गरिबांचे तारणहार, विकासाचे प्रणेते आणि आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे पूर्ण होत आहे.”

राष्ट्रीय प्रतीकांचा आदर हा कोणत्याही राजकारणापेक्षा वरचढ असायला हवा, असे सांगत त्यांनी प्रतिपादन केले की, हे विधेयक कोणत्याही व्यक्तीच्या किंवा विचारसरणीच्या विरोधात नाही, तर ते देशाची प्रतिष्ठा आणि आपली सामायिक राष्ट्रीय जाणीव यांच्या हिताचे आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments