scorecardresearch
Wednesday, 19 August, 2026
घरराजकारणसोनम वांगचुक यांच्या मागण्यांना काँग्रेसचा जाहीर पाठिंबा, 'सीजेपी’बाबत मौनच

सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना काँग्रेसचा जाहीर पाठिंबा, ‘सीजेपी’बाबत मौनच

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरत, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांनी सोनम वांगचुक यांना त्यांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबतची आपली मौनव्रताची भूमिका सोडत, काँग्रेसने गुरुवारी त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. पक्षाचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणीही पुन्हा एकदा ठामपणे मांडली. “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून हीच मागणी करत आहे. श्री. वांगचुक यांची व्यथा आणि संताप आम्ही समजू शकतो; विशेषतः मोदी सरकारमधील उत्तरदायित्वाचा अभाव, आणि त्यातही प्रामुख्याने परीक्षा व्यवस्था कोलमडल्याबद्दलची त्यांची खंत आम्हालाही जाणवते,” असे वेणुगोपाल यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

“त्यांची प्रकृती पाहता, आम्ही श्री. वांगचुक यांना त्यांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन करतो. त्यांच्या चिंता या आमच्या आणि इतर विरोधी पक्षांच्याही चिंता आहेत. खात्री बाळगा, आम्ही  मोदी सरकारचा विरोध करणे आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे सुरूच ठेवू,” असे त्यांनी पुढे म्हटले. मात्र, वेणुगोपाल यांच्या ‘एक्स’ पोस्टमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’चा (सीजेपी) उल्लेख नव्हता; या पक्षानेच नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर आंदोलनाची सुरुवात केली होती. वांगचुक नंतर या सीजेपीच्या आंदोलनात सामील झाले आणि गेल्या 19 दिवसांपासून जंतरमंतरवर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी, आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी जंतरमंतरला भेट दिली.

काँग्रेसच्या सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, पक्ष या आंदोलनाबाबत सावध भूमिका घेत आहे, कारण हे आंदोलन अधिकाधिक डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून चालवले जात असल्याचे त्यांना वाटते. तसेच, याचे रूपांतर ‘आप 2.0’ मध्ये होऊ शकते आणि ही राजकीय शक्ती कालांतराने काँग्रेसचा जनाधार हिरावून घेऊ शकते, अशी भीतीही त्यांना वाटत आहे. वांगचुक यांच्या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा का दिला नाही, याबद्दल विचारणा झाल्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती; त्यानंतर काही तासांतच वेणुगोपाल यांचे हे विधान आले. “आम्ही सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी करत आहोत. आम्ही प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत,” असे सांगत रमेश यांनी नमूद केले की, काँग्रेस गेल्या दोन महिन्यांपासून हा मुद्दा उपस्थित करत आहे.

गेल्या तीन आठवड्यांत आप, सप, शिवसेना (उबाठा), तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएमएल-लिबरेशन आणि राष्ट्रीय जनता दल यांसारख्या पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. द्रमुकच्या नेत्यांनीही आंदोलनस्थळाला भेट दिली आहे, तर डाव्या पक्षांचे, आप, सप आणि टीएमसीचे प्रतिनिधीमंडळ जंतरमंतरवर आंदोलकांना भेटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही यापूर्वी वांगचुक यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी परीक्षापद्धतीबाबतच्या वांगचुक यांच्या चिंतांशी सहमती दर्शवत त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते, तसेच त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सोडवणे गरजेचे असल्याचे आश्वासनही दिले होते.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments