नवी दिल्ली: गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवून उपचारासाठी मध्य दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी 7 वाजता पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी पोहोचले. आंदोलकांना पांगवले गेले आणि पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेतले. आंदोलनस्थळ रिकामे करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या जात असतानाच, काही आंदोलकांचा ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ (आरएएफ), ‘सीआरपीएफ’ आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांशी संघर्ष झाला.
एका निवेदनात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून आणि वांगचुक यांची खालावलेली प्रकृती लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई केली. “माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. तरीही, पोलिसांनी अत्यंत संयम बाळगला आणि सुरक्षितपणे ही कारवाई पूर्ण केली. आम्ही जंतरमंतरवरील आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आणि शांततेने ही जागा रिकामी करावी,” असे पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित त्रुटींच्या मुद्द्यावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) समर्थनार्थ वांगचुक 20 दिवसांपासून उपोषणावर होते. ज्या तात्पुरत्या मंचावरून आंदोलन सुरू होते, तिथले फलक ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’च्या जवानांनी काढून टाकले आणि स्वयंसेवक व समर्थकांना परिसर रिकामा करण्यास सांगितले. वारंवार सूचना देऊनही अनेक आंदोलकांनी जागा सोडण्यास नकार दिला. ‘सीजेपी’चे अभिजीत दिपके यांच्याभोवती मानवी साखळी तयार करण्यात आली; त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.

उत्साही जमावाला संबोधित करताना ‘सीजेपी’चे दिपके म्हणाले, “मी अमेरिकेतून पळून जाण्यासाठी आलो नाही. ते हे आंदोलन संपवू शकत नाहीत. हे आंदोलन शांततापूर्ण राहिले आहे आणि यापुढेही शांततापूर्णच राहील. आम्हाला महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांमुळे प्रेरणा मिळत आहे आणि ही चळवळ संविधानानुसार सुरू राहील. कोणीही आमचा उत्साह किंवा जिद्द मोडून काढू शकत नाही.” दिपके यांनी शनिवारी पहाटे ‘एक्स’वर पोस्ट करून आरोप केला, की दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर कठोर कारवाई सुरू केली आहे: “दिल्ली पोलीस जंतरमंतरवर कारवाई करत आहेत. लोकांना मारहाण केली जात आहे आणि सोनम सर यांना नेले जात आहे.” असे त्यांनी लिहिले. “आतापर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, परंतु या निंदनीय कृत्यानंतर आता आम्ही नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करू. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आणि ताब्यात घेतले,” असेही त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा, त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, की, “अशा अनेक घटना घडल्या ज्यात लोकांनी गोंधळ निर्माण केला, परंतु पोलिसांनी तासनतास काहीच कारवाई केली नाही”. आंदोलकांनी असा दावा केला की, दोन व्यक्तींनी सोनम वांगचुक यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने काहीतरी फेकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांनी त्या व्यक्तींना तिथून नेले. “जंतर-मंतरवर गुंडांनी सोनम सर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दिशेने एक वस्तू फेकण्यात आली, पण सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही,” असे दिपके यांनी ‘एक्स’वर लिहिले.
“काही दिवसांपूर्वी, पोलिसांमधील एका अंतर्गत सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी इशारा दिला होता की, आंदोलन विस्कळीत करण्यासाठी जंतरमंतरवर लोकांना पाठवले जाईल. जर सोनम सर यांच्याबाबतीत काही अघटित घडले, तर त्याला सरकार जबाबदार असेल; कारण जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलन मोडून काढण्याचा स्पष्ट कट रचला गेला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

Recent Comments