नवी दिल्ली: ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांचा वाढता दबाव पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिला. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने सांगितले, की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी नमूद केले की, “जंतरमंतर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये. आम्ही देशातील तरुणांना गोंधळाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही.
सरकारी सूत्रांनी शुक्रवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांना स्पष्टपणे सांगितले होते, की प्रधान राजीनामा देणार नाहीत, असे असूनही त्यांनी राजीनामा दिला. प्रधानांच्या राजीनाम्याची आणि पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणाऱ्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेपरफुटीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालये आणि कडक कायदा स्थापन करण्याची घोषणा केली. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या आपल्या राजीनामा पत्रात प्रधान म्हणाले, “भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. देशातील तरुणांना गोंधळाच्या दुष्टचक्रात अडकू न देणे, हा माझा संकल्प आहे. जंतरमंतर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थतीचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी आणि भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये; तसेच आपल्या मुलांनी अभ्यासात आणि करिअर घडवण्यात वेळ घालवावा, हे लक्षात घेऊन मी माननीय पंतप्रधानांकडे माझा राजीनामा पाठवला आहे.”
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी ) नेतृत्वाखाली, नीट 2026 पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर आणि देशाच्या इतर भागांत मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. याआधी गुरुवारी रात्री, निदर्शकांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी वांगचुक यांच्या निर्णयाचे स्वागत केले, परंतु प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. आपल्या राजीनामा पत्रात प्रधान यांनी म्हटले आहे की, भारताची युवाशक्ती हीच देशाची खरी ताकद आहे आणि देशाच्या लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा नेहमीच अढळ विश्वास राहिला आहे. त्यांनी सांगितले की, भारताच्या तरुणांच्या आकांक्षा आणि स्वप्नांबद्दल त्यांना मनापासून आदर आहे. “ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नवीन आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि शिल्पकारही आहेत. गेल्या 10 दिवसांतील घटनांमुळे मला दुःख झाले आहे. ही माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेची बाब नाही,” असेही ते म्हणाले.
आपल्या दोन पानांच्या पत्रात प्रधान यांनी नमूद केले की, गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिले आहेत. “माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदर्शी शिक्षण व्यवस्था हाच एका सशक्त राष्ट्राचा पाया असतो. देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि वाजवी अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने पूर्ण करणे ही आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक बांधिलकी राहिली आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाला सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे त्यांनी पुढे नमूद केले.

Recent Comments