मुंबई: “मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयके ही धोकादायक बाब असून ती देशाच्या हिताची नाहीत”. असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले. ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आमदार असलेल्या रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) हातमिळवणी करण्याची शक्यताही फेटाळून लावली. रोहित म्हणाले की, “संविधान (131 वी घटनादुरुस्ती) विधेयक, 2026’ मंजूर झाल्यास मतदारसंघांची पुनर्रचना अशा प्रकारे केली जाऊ शकते, ज्यामुळे भाजपला फायदा होईल; आणि अशा गोष्टीला मी पाठिंबा देऊ शकत नाही. सर्व राज्यांमध्ये समानरीत्या 50 टक्के जागा वाढवून हे केले जावो, किंवा त्यापेक्षा कमी-अधिक प्रमाणात, माझ्या मते ही एक धोकादायक बाब आहे आणि देशासाठी ती हितावह नाही,” असे त्यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.
रोहित यांच्या आत्या आणि बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, जर सरकारने सर्व राज्यांमधील संसदीय जागांमध्ये समानरीत्या 50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला, तर त्यांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो. त्यांच्या या विधानाकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने या विधेयकाबाबतची आपली भूमिका मवाळ केल्याचे संकेत म्हणून पाहिले गेले; कारण यापूर्वी त्यांनी ‘संविधान (131 वी घटनादुरुस्ती) विधेयक, 2026’ च्या विरोधात मतदान केले होते. प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत 17 एप्रिल रोजी फेटाळले गेले, कारण त्याला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळाले नाही. ‘द प्रिंट’शी बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबंधित विधेयकांविरोधातील आपली भूमिका पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे. “आमच्या पक्षात लोकशाही आहे आणि प्रत्येकाची स्वतःची मते असतात. पण मला असेही वाटते की सुप्रिया सुळे यांचे म्हणणे असे होते की, जर हे घटनात्मक पद्धतीने केले गेले तर पक्ष त्याला पाठिंबा देईल; मात्र भाजप तसे करेल असे मला वाटत नाही.”
अशा प्रक्रियेचा फायदा केवळ सत्ताधारी भाजपलाच होतो, हे दर्शवण्यासाठी त्यांनी 2023 मधील आसाममधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे उदाहरण दिले. ‘फ्रंटलाइन’च्या विश्लेषणानुसार, या प्रक्रियेमुळे राज्यातील मुस्लिम-बहुल जागांची संख्या सुमारे 29-30 वरून 22-23 पर्यंत कमी झाली, तर मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या जागांची संख्या 41 वरून 26 पर्यंत खाली आली. “मतदारसंघांची पुनर्रचना अशा प्रकारे करण्यात आली की त्याचा फायदा केवळ भाजपलाच झाला आणि मला वाटते की राष्ट्रीय स्तरावरही तीच टीम यावर काम करत आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
‘कॉकरोच जनता पार्टी’ या संकल्पनेबद्दल बोलताना रोहित म्हणाले की, या चळवळीला पाठिंबा देण्याबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तरुणांनी धैर्य दिले आहे. “तरुणांनी निर्भय कसे असावे हे दाखवून दिले आणि जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता ते सर्व एकत्र आले. ते सर्व भारतीय होते आणि यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “राहुल गांधीजी, (शरद) पवार साहेब आणि अखिलेशजींसारखे अनेक नेते सरकारविरोधात आवाज उठवत आहेत; मात्र या आंदोलनामुळे नेत्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली असून आता विरोधी पक्ष आक्रमक पवित्रा घेत आहे.”
‘मी एनडीएसोबत नक्कीच जाणार नाही’
मुलाखतीदरम्यान रोहित यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) राष्ट्रवादी काँग्रेस (शप) सामील होण्याच्या बाजूने ते नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांची ही विधाने आली आहेत; वास्तविक, सुप्रिया सुळे यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते, की त्यांचा पक्ष ‘इंडिया’ आघाडीचाच एक भाग आहे. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या या दोन गटांमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती.
‘एनडीए’ला विरोध करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेणाऱ्या रोहित पवार यांनी सांगितले की, भाजपशी हातमिळवणी करण्यापेक्षा विरोधी पक्षात राहणेच त्यांना पसंत आहे. “मी विरोधी पक्षात राहून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्याबाबत अगदी स्पष्ट आहे. माझे वय 40 वर्षे आहे आणि राजकारणात माझ्यासमोर अजून 30 वर्षांचा काळ आहे. जर सर्वजण एनडीएमध्ये सामील झाले, तर विरोधी पक्षात कोण राहणार?” ते पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत मी अनेक तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. मला असे जाणवले आहे की त्यांना ‘हो’ किंवा ‘नाही’ असे स्पष्ट उत्तर हवे असते; यात कोणताही मधला मार्ग नको असतो. त्यामुळे मी निश्चितपणे एनडीएच्या बाजूने जाणार नाही.” सत्ताधारी भाजपशी संवाद साधण्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांवरही रोहित यांनी भाष्य केले.
“त्यांचे हेतू कदाचित प्रामाणिक असतील; मतदारसंघातील कामे किंवा जनतेच्या प्रश्नांसाठी ते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत असतील,” असे ते म्हणाले. “पण यामुळे जनतेमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. जर तुम्ही कामाच्या वेळेत किंवा त्यानंतरही सतत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना भेटत राहिलात, तर गोंधळ निर्माण होईल आणि लोकांचा आमच्यावरील विश्वास उडेल.” एनडीएमध्ये सामील होण्याच्या बाजूने असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील काही नेत्यांच्या चर्चांवर थेट भाष्य न करता रोहित म्हणाले की, जर अशी युती झालीच, तर मी किंवा सुप्रिया सुळे त्यास कधीच अनुकूल नसू. “जर काही नेते त्या बाजूला गेले, तर मी त्यांना निरोपही (बाय-बाय) देणार नाही. आम्ही त्वरित कामाला लागू आणि आमचा पक्ष उभारू,” असे ते म्हणाले.
विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी बाजूकडे जाण्याचा विचार करत आहेत, त्यामागे मंत्रिपदाच्या ऑफर्स हे एक कारण असल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले. भूतकाळात आपल्याला अनेकदा मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु आपण ती नाकारली होती, असा दावाही त्यांनी केला. ‘महाविकास आघाडी सत्तेवर असताना, पवार कुटुंबातील सदस्य असल्यामुळे मला मंत्री होण्याची संधी होती, पण मी तसे केले नाही’, असे रोहित यांनी सांगितले. “नंतर, जेव्हा अजित दादांनी पक्षातून बाहेर पडून वेगळी वाट धरली, तेव्हा त्यांनी मला एका पदाची ऑफर दिली आणि त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. मी ती नाकारली. त्यानंतर लोकसभा निवडणुकांनंतर आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी अजित दादांनी पुन्हा माझी भेट घेतली आणि मला मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही मी ती नाकारली. जे लोक (पक्ष सोडून) जात आहेत, त्यांना मंत्री व्हायचे आहे; पण मी ती संधी आधीच नाकारली आहे. त्यामुळे मंत्री होणे हे माझे अंतिम ध्येय नसून जनतेसाठी लढा देणे हेच माझे ध्येय आहे. म्हणूनच, मी भाजप आणि एनडीएविरोधात आक्रमक भूमिका घेईन आणि विरोधी पक्षातच राहीन,” असे ते म्हणाले.
आपले व्यावसायिक हितसंबंध असल्याने या निर्णयामुळे आपण अडचणीत येऊ शकतो, याची जाणीव या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदाराला आहे; तरीही, आपण यापूर्वीच आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेलो असून आपल्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Recent Comments