नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या सुरुवातीच्या कलानुसार, ‘जनसुराज पक्षा’चे संस्थापक प्रशांत किशोर हे बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील आपल्या पहिल्याच निवडणुकीच्या रिंगणात आघाडीवर आहेत. किशोर यांचा सामना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्याशी होत आहे, जे स्वतःदेखील पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. जेएसपीचे संस्थापक आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये भाजपच्या पुढे राहिले आहेत. आरजेडीच्या रेखा गुप्ता या स्पर्धेतून बाहेर पडल्याचे दिसत आहे.
मतमोजणीच्या 12 फेऱ्यांनंतर, किशोर यांना 23 हजार 756, सिन्हा यांना 17 हजार 110 आणि गुप्ता यांना 4 हजार 850 मते मिळाली आहेत. एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिल्याने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते नितीन नबीन यांची बांकीपूरची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी 30 जुलै रोजी मतदान झाले होते. या जागेसाठीच्या प्रक्रियेत काही नाट्यमय घडामोडीही पाहायला मिळाल्या; बांकीपूरमधून अभिषेक बंटी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच भाजपने पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या जागी नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली.
किशोर यांनी पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्तिकेय कुमार शर्मा यांच्यावर मतदारांवर दबाव टाकण्यासाठी पोलीस अधिकारांचा गैरवापर केल्याचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही केला होता. पत्रकार परिषदेत बोलताना जेएसपी नेत्याने सांगितले की, अनेक लोकांच्या घरांवर छापेही टाकण्यात आले. किशोर यांनी दावा केला, की त्यांच्या पक्षाने हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे मांडला होता. भाजपसाठी बांकीपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे. ‘हाय-प्रोफाइल’ मानली जाणारी ही जागा भाजपचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी हा मतदारसंघ ‘पाटणा पश्चिम’ विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. नबीन यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा यांनी 1995 पासून 2006 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत अनेकदा ही जागा जिंकली होती. या मतदारसंघातील 25 टक्क्यांहून अधिक मतदार ‘कायस्थ’ समाजाचे आहेत, ज्या समाजाचे नबीन स्वतः आहेत. तसेच, या मतदारसंघात ‘भूमिहार’ या उच्चवर्णीय समाजाचेही लक्षणीय प्रमाण आहे.
वडिलांच्या निधनानंतर नबीन यांनी निवडणूक राजकारणात प्रवेश केला आणि 2006 च्या पोटनिवडणुकीत ही जागा पहिल्यांदा जिंकली. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवला होता आणि आरजेडीच्या उमेदवाराचा जवळपास 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. गेल्यावर्षीच्या बिहार निवडणुकीत नबीन यांनी सलग पाचव्यांदा ही जागा जिंकली होती आणि आरजेडीच्या उमेदवाराचा जवळपास 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. विजयाचे अंतर वाढवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले होते; त्यासाठी पक्षाच्या नेत्याने मतदारसंघात अनेक बैठका घेतल्या आणि जोरदार प्रचार केला. ‘जनसुराज पदयात्रा’ या नावाने संपूर्ण बिहारभर दोन वर्षे चाललेल्या पदयात्रेनंतर, किशोर यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी ‘जनसुराज पक्ष’ स्थापन केला. 2021 मध्ये राजकीय सल्लागार म्हणून आपली कारकीर्द थांबवल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले.
जन सुराज पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, या संपूर्ण मोहिमेचे व्यवस्थापन व्यावसायिकांकडून केले गेले. पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्रत्येकी चार मतदान केंद्रांची (बूथची) जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांना त्यासंबंधीचे अहवाल सादर करावे लागत असत. किशोर यांच्यासोबत दररोज रात्री आढावा बैठक घेतली जात असे, असेही त्यांनी सांगितले. “यासाठी बूथ समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्यातील काही सदस्य हे त्या-त्या भागातील स्थानिक प्रतिनिधी असतील याची काळजी घेतली गेली. प्रत्येक गोष्टीचे अत्यंत बारकाईने नियोजन करण्यात आले होते आणि आम्हाला ही जागा जिंकण्याची आशा आहे.”
गेल्यावर्षीच्या बिहार निवडणुकीत किशोर यांनी 243 पैकी 238 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही आणि त्यांना केवळ 3.4 टक्के मते मिळाली.

Recent Comments