तिरुवनंतपुरम: केरळमध्ये ‘लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट’ला (एलडीएफ) निवडणुकीत मोठा फटका बसून महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यानंतर, पक्षाची पुनर्बांधणी आणि वाटचाल सुरू ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)’ म्हणजेच सीपीआयएमने मंगळवारी व्हॉट्सॲप, ईमेल आणि इतर माध्यमांतून जनतेचे मत जाणून घेण्याची घोषणा केली. सीपीआयएम हे एलडीएफचे नेतृत्व करणारा मुख्य पक्ष आहे; एलडीएफ ही डाव्या पक्षांची आघाडी असून नुकतीच ती सत्तेतून बाहेर फेकली गेली आहे.
तिरुवनंतपुरम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सीपीआयएमचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन म्हणाले की, पक्ष ऑगस्टमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेईल. यात भविष्यातील वाटचालीचे नियोजन केले जाईल आणि संघटनात्मक व राजकीय स्पष्टता राखत पक्षाच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहण्यावर भर दिला जाईल. गोविंदन यांनी सांगितले की, पक्षाने यापूर्वीच आपल्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मते जाणून घेतली आहेत, परंतु आता ही प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत विस्तारण्याचा पक्षाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पक्ष आगामी काळात स्वतःला बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करेल. तसेच, व्हॉट्सॲप, ईमेल, संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे जनतेचे मत जाणून घेण्यासाठी ‘पुथुवाझिकल’ (नवीन मार्ग) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
“सध्याच्या काळातील आव्हानांचा यशस्वीपणे सामना कसा करायचा आणि केरळच्या सकारात्मक परंपरांचा आधार घेत राज्याला अधिक प्रभावीपणे पुढे कसे न्यायचे, हा मुख्य प्रश्न आहे. आम्हाला समाजातील सर्व घटकांचा पूर्ण पाठिंबा मिळवायचा आहे. पत्रकार, प्रसारमाध्यमांमधील कर्मचारी आणि इतर सर्वांनाच आपली मते मांडण्याची संधी मिळेल,” असे गोविंदन म्हणाले. गोविंदन यांनी सांगितले की, एप्रिलमधील केरळ विधानसभा निवडणुकीबाबतचा आढावा अहवाल तयार करताना पक्षाने राज्यभरातील विविध शाखांमधील लाखो कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. पराभवाच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यात पक्ष अपयशी ठरला, ही आत्मटीका पक्षाच्या नेतृत्वाने स्वीकारली असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफला विधानसभेच्या 140 पैकी केवळ 35 जागा जिंकता आल्या; या दारुण पराभवात डझनहून अधिक विद्यमान मंत्र्यांचाही पराभव झाला.
पराभवाचे विश्लेषण
गोविंदन म्हणाले की, राजकीय विरोधकांनी जात आणि समुदायावर आधारित केलेल्या राजकीय एकत्रीकरणामुळे राज्यातील डाव्या विचारसरणीचे राजकारण कमकुवत झाले, असे पक्षाच्या विश्लेषणातून समोर आले आहे. तसेच, सर्वच समुदायांमधील मते कमी-अधिक प्रमाणात डाव्या पक्षाला गमवावी लागली, असे पक्षाचे मत आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, पक्ष डाव्या आघाडीच्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरला. तसेच, कन्नूरमधील तालिपरंबा आणि पय्यानूर मतदारसंघांतील उमेदवार निवडीसह पक्ष संघटनेत काही त्रुटी राहिल्या.
निवडणुकीच्या काळात पक्षाला या दोन्ही मतदारसंघांत अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागला. अखेरीस, या दोन्ही जागांवर यूडीएफपुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले सीपीआय(एम)चे दोन माजी ज्येष्ठ नेते विजयी झाले. तालिपरंबा मतदारसंघात सीपीआय(एम)ने गोविंदन यांच्या पत्नी पी.के. श्यामला यांना उमेदवारी दिली होती. “पय्यानूर आणि तालिपरंबा मतदारसंघांतील उमेदवार निवड प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटींची माहिती कन्नूर जिल्हा समितीनेच ‘आत्मपरीक्षण’ अहवालाचा भाग म्हणून राज्य समितीसमोर मांडली. राज्य समितीनेही हे आत्मपरीक्षण मान्य केले आहे,” असे त्यांनी सांगितले. सीपीआयएमने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विद्यमान ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ सरकारवरही टीका केली. सुमारे 30 मतदारसंघांत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात समझोता झाल्याचे पुरावे सापडल्याचा आरोप पक्षाने केला. गोविंदन यांनी नमूद केले की, राज्यात भाजपने जिंकलेल्या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली.
प्रशासन आणि उच्चशिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव वाढू दिल्याबद्दलही पक्षाच्या नेत्याने यूडीएफ सरकारवर टीका केली. “महात्मा गांधी विद्यापीठाच्या सिनेटवर संघ परिवाराशी संबंधित 19 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आणि त्याविरुद्ध सरकार एक शब्दही बोलायला तयार नव्हते,” असे ते म्हणाले. त्यांनी असाही आरोप केला की, विरोधी पक्षनेते असताना मंगळुरूमध्ये अदानी समूहाचे अधिकारी आणि ‘नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स’चे (एनडीए) नेते यांच्यात झालेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्री व्ही.डी. सतीसन यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आधी, मंगळुरूमध्ये सतीसन, कर्नाटक जनता दल (सेक्युलर) चे नेते बी.एम. फारूक आणि काही व्यावसायिक सहकारी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर आले होते. यामुळे एनडीएचे नेते आणि अदानी समूहाशी संबंधित व्यक्ती यांच्यातील संबंधांबाबत सीपीआय(एम)ने आरोप केले.
सतीसन यांनी या टीकेला अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. हा आरोप महत्त्वपूर्ण ठरतो, कारण काँग्रेसने स्वतःला ‘नेहरूवादी डावी विचारसरणी’ मानणारा पक्ष म्हणून सादर केले होते, तर सीपीआय(एम)ची भूमिका अत्यंत ‘उजव्या विचारसरणी’ची असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. नेहरूवादी आर्थिक तत्त्वांशी बांधील असल्याचा दावा करूनही सरकार खासगीकरणाचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप सीपीआय (एम) ने केला. “येथे कोणतीही नेहरूवादी विचारसरणी नाही. गेल्या तीन आठवड्यांतील कृतींचे अवलोकन केल्यास, पूर्णपणे अति-उजव्या विचारसरणीचा दृष्टिकोन दिसून येतो,” असे त्यांनी म्हटले.

Recent Comments