नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील उपोषणाला उत्तर म्हणून भाजपने राज्यांमधील काँग्रेस कार्यालयांबाहेर निदर्शने केली असून, सभागृहाचे अधिवेशन सुरू असताना संसदेत चर्चेत सहभागी होण्याऐवजी निदर्शने केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, सिंग म्हणाले, की ‘सरकारने प्रत्येक मुद्द्यावर वादविवाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, परंतु विरोधक स्वतःच्या राजकीय हितासाठी विद्यार्थी आणि तरुणांना राजकीय साधने म्हणून वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत’.
“दिल्लीत सुरू असलेली निदर्शने ही गंभीर चिंतेची बाब आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, की काही व्यक्ती आपल्या राजकीय हितासाठी आपल्या देशातील विद्यार्थी आणि तरुणांना राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार विद्यार्थी आणि तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणाची खात्री करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” सिंग यांनी हिंदीत आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर आणि जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्यांना त्यांचे आंदोलन मागे घेण्यास आणि प्रशासनाला सामान्य स्थिती पूर्ववत करण्यास मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर ही विधाने आली. सिंग म्हणाले की, ‘आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक चिंतेचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे’.
नीट पेपरफुटी आणि आंदोलकांवर पोलिसांच्या कारवाईवरून सरकारवर झालेल्या हल्ल्याबद्दल विरोधकांवर निशाणा साधत सिंग म्हणाले, की “भारतातील जागरूक, परिपक्व आणि विवेकी तरुण अशा दिशाभूल करणाऱ्या प्रयत्नांना स्पष्टपणे समजून घेतील आणि ते प्रगती, विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा मार्ग निवडतील. कोणावरही, विशेषत: आमच्या विद्यार्थी आणि तरुणांवर अन्याय होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. काही विरोधी नेत्यांनी निर्माण केलेली ‘उत्पादित संतापाची भावना’ हा जनतेला, विशेषतः आमची मुले आणि तरुणांना भ्रमित करण्याचा आणि दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे. सरकार तरुणांच्या भावना आणि चिंतांबाबत अत्यंत संवेदनशील आहे”.
“परंतु, विरोधक संसदेऐवजी रस्त्यावर प्रश्न सोडवण्याचा अयोग्य प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत संसद हे प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे आणि तेथे विरोधी पक्ष आपले मत मांडण्यास मोकळे आहेत. त्यामुळे, विरोधक या प्रश्नाबाबत गंभीर असल्यास, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरळीत कामकाजात व्यत्यय आणू नये,” असेही ते म्हणाले.
भाजपचा निषेध
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील अघोषित धरणे आंदोलनाला उत्तर म्हणून भाजपने अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली. व्हीव्हीआयपी 7, लोककल्याण मार्गावर जवळपास तीन तासांच्या स्टँडऑफनंतर, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा आणि समाजवादी पार्टी (सप) प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी हटवले. काँग्रेस नेतृत्वाने मंगळवारी रात्रभर धरणे देण्याची घोषणा केली, ज्यात देशाच्या शिक्षणव्यवस्थेला जबाबदार असलेल्या मुद्द्यांची जबाबदारी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या संसदेकडे मोर्चादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई, हे मुद्दे प्रामुख्याने होते.
या पार्श्वभूमीवर, बुधवारी भाजपच्या विविध राज्य शाखांनी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निदर्शने आणि धरणे आंदोलने केली.भोपाळमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचे आंदोलन केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये, भाजपचे प्रदेशाध्यक्ष एन. रामचंद्र राव आणि पक्षाचे इतर नेते नामपल्ली येथील कार्यालयातून बाहेर पडून हैदराबादमधील गांधी भवन येथे आंदोलन करण्याच्या तयारीत होते; मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. अहमदाबादमध्येही कडक पोलीस बंदोबस्तात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
बेंगळुरूमध्ये कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (केपीसीसी) कार्यालयासमोरही भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात निदर्शने केली. त्याचप्रमाणे, आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि दिल्लीतील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ काँग्रेस पक्षाने केलेल्या निदर्शनांचा निषेध केला. देशभरातील भाजपच्या विविध शाखांनी केलेल्या या निदर्शनांना दुजोरा देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंग म्हणाले की, “राहुल गांधी केवळ अराजकता आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे अजिबात स्वीकारार्ह नाही. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करून राहुल गांधींनी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे मुळीच स्वीकारार्ह नाही. त्यांनी लोकांनाही मोठ्या संख्येने तिथे येण्याचे आवाहन केले होते. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तुम्ही खेळू शकत नाही; समजा एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्यांने काही अनुचित प्रकार केला असता, तर त्याला जबाबदार कोण राहिले असते?” असा सवाल त्यांनी केला.
सिंग म्हणाले की, काँग्रेस सीजेपीसोबत स्पर्धा करत असल्याचे दिसते आणि आता या आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Recent Comments