चेन्नई: सोमवारी तंजावरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर, तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते (एलओपी) उदयनिधी स्टॅलिन आज, मंगळवारी सकाळी तंजावरमध्ये अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त नरेंद्रन नायर यांनी पुष्टी केली की, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे आमदार उदयनिधी यांच्या विरोधात अभिनेत्री त्रिशाबद्दल कथितरित्या केलेल्या अपमानजनक टिप्पणीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सत्ताधारी तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षानेही त्यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) तक्रार दाखल केली होती. “माझ्या अटकेकडे मी एक विनोद म्हणून पाहतो आणि मी कायदेशीर मार्गाने याचा सामना करेन,” असे उदयनिधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी, उदयनिधी यांना अटक करण्यापासून पोलिसांना रोखण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्येष्ठ वकील हसन मोहम्मद जिन्ना यांनी युक्तिवाद केला की, उदयनिधी यांना विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यापासून रोखण्यासाठी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात होता. उच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेत्यांनी दाखल केलेल्या तातडीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे मान्य केले. न्यायमूर्ती जी.के. इलांथिरईयन यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. हे निश्चित करण्यापूर्वी त्यांना सांगण्यात आले होते, की तंजावूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी तोंडी सूचनाही न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना केली होती. मात्र, सकाळी 11 च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.
कावेरी पाणी प्रश्नाबाबत शेतकरी वर्गाच्या चिंता मांडण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान, उदयनिधी यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘तमिळगा वेत्री कळघम’ सरकारवर टीका केली. त्यांनी आरोप केला की, पाणी सोडण्यात आले नाही आणि मुख्यमंत्री या विषयावर गप्प आहेत, तर दुसरीकडे ते ‘द्रमुक’विरुद्ध गुन्हे दाखल करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. कर्नाटकचा प्रस्तावित ‘मेकेदातू बॅलन्सिंग रिझर्व्होअर’ प्रकल्प थांबवणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे आणि कावेरी डेल्टा जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करणे, अशा मागण्या या निदर्शनादरम्यान करण्यात आल्या. त्यांनी कावेरीतून पाणी न सोडल्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. “पाणी यायला हवे होते. पण आज, पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. पण मुख्यमंत्री याबद्दल काही बोलत आहेत का? नाही, ते बोलत नाहीत. त्यांना फक्त याचीच चिंता आहे, की ‘द्रमुक’विरुद्ध कोणते खोटे आरोप करता येतील? कोणते बनावट गुन्हे दाखल करता येतील?” असे ते म्हणाले.
भाषणादरम्यान, जमावातील काही लोकांनी “त्रिशा! त्रिशा!” (अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा संदर्भ देत) अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी ती कथित टिप्पणी केली आणि नंतर स्पष्ट केले, की ते कावेरीबद्दल बोलत होते. या टिप्पणीवर तीव्र टीका झाली; टीव्हीके आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याला ‘घृणास्पद, अश्लील, अभद्र आणि लज्जास्पद’ म्हटले आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. टीव्हीके पदाधिकाऱ्यांनी तंजावर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि कारवाई, स्पष्टीकरण व माफीची मागणी करत राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. सोमवारी सकाळी उदयनिधी यांच्या अटकेपूर्वी त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती. सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या द्रमुक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. द्रमुक आणि सत्ताधारी टीव्हीके यांच्यातील वाढत्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
‘द्रमुक’चे खासदार टी.आर. बालू यांनी उदयनिधी यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, त्यांनी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख केला नव्हता. “त्यांनी त्या विशिष्ट महिलेबद्दल कोणताही शब्द उच्चारलेला नाही. हे सर्व खोटे आहे,” असे बालू यांनी पत्रकारांना सांगितले.

Recent Comments